Monday, September 1, 2025

Manoj Jarange: न्यायालयाच्या आदेशानंतर मनोज जरांगेनीही दिला आंदोलकांना दम, हुल्लडबाजी करणाऱ्यांना म्हणाले...

Manoj Jarange: न्यायालयाच्या आदेशानंतर मनोज जरांगेनीही दिला आंदोलकांना दम, हुल्लडबाजी करणाऱ्यांना म्हणाले...

काही तासांत रोडवरील गाड्या मैदानात लावा, मैदानातच झोपा, त्रास होईल असं वागू नका, जरांगे यांचे आंदोलकांना आवाहन

मुंबई: मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईच्या आझाद मैदानावर लाखोंच्या संख्येने मनोज जरांगे समर्थकांनी गर्दी केली आहे. ही गर्दी केवळ मैदानातच नव्हे तर मुंबईच्या रस्त्यावर, रेल्वे स्थानकावर तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी देखील पाहायला मिळत आहे. ज्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यात अनेकजण हुल्लडबाजी करताना दिसून येत आहे. ज्याचा त्रास मुंबईकरांना आणि वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. हूल्लडबाजांच्या वाढत्या व्यापामुळे अखेर न्यायालयाने मनोज जरांगे यांना त्यांच्या आंदोलकांना आवर घालण्याचे आणि मंगळवारपर्यंत सर्व रस्ते रिकामे करून देण्याचे निर्देश दिले आहेत.  यामुळे आता मनोज जरांगे यांनी आंदोलकांमधील हुल्लडबाजांना दम भरत,  "मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका", असे आवाहन केले आहे. तसेच जे कोणी ऐकणार नसेल त्यांनी गावी निघून जावे असे देखील म्हंटले आहे.

पुढच्या काही तासांमध्ये ज्या रोडवर गाड्या आहेत त्या मैदानात नेऊन लावा. तुम्ही सुद्धा मैदानावर झोपा, मराठा समाजाला गर्व वाटेल असं काम करा असं मनोज जरांगे  म्हणाले.

कुणाचं ऐकून गोंधळ घालू नका: जरांगे

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये काही ठिकाणी हुल्लडबाजी होत आहे, न्यायालयाच्या निर्देशांचे पालन होत नाही असा आरोप एका याचिकेद्वारे न्यायालयात करण्यात आला. त्यावर मंगळवारी दुपारीपर्यंत मुंबईतील सर्व रस्ते रिकामे करा असे निर्देश न्यायालयाने दिले. त्यानंतर मनोज जरांगे यांनीही तशाच प्रकारचं आवाहन केले आहे. "मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, कुणाचं ऐकून गोंधळ घालू नका" असं आवाहन जरांगे यांनी केलं. मुंबईच्या रस्त्यांवर असलेल्या गाड्या आझाद मैदानाच्या बाजूच्या क्रॉस मैदानात लावा, तिथेच झोपा असंही जरांगे म्हणाले. जर कुणी ऐकणार नाही तर त्याने गावाकडे परत जावं, कुणाच्या आदेशावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना स्थान नाही. मी शेवटचं सांगतोय, आंदोलनाला बदनाम करू नका अन्यथा सोडणार नाही असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला. मुंबईकरांना त्रास होईल किंवा न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन होईल असे काही करू नका असं आवाहन जरांगे यांनी केलं.

आंदोलनात चुकीचे लोक घुसल्याचा आरोप

काही लोकांच्या सांगण्यावरून आंदोलनात चुकीचे लोक घुसल्याचा आरोप जरांगे यांनी केला. ते म्हणाले की, "कुणीतरी एकटा आहे तो लोकांना उचकावतोय, आंदोलकांना रस्ता अडवायला सांगतो आहे. अंतरवालीमध्येही त्याने हेच केलं होतं. मूक मोर्चावेळीही तेच केलं होतं. असे चाळे करू नकोस, कारण माझ्या जातीचा प्रश्न आहे. तुला नेत्याचे पाय चाटायचे आहेत, पण सावध हो." असा इशारा जरांगे यांनी हुल्लडबाजी करणाऱ्या व्यक्तींना दिला आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, "मी मेलो तरी या ठिकाणाहून उठणार नाही, आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही. जर तुम्हाला आरक्षण नको असेल, गोंधळ घालायचा असेल तर तुमच्या गावाकडे जा. मला माझ्या जातीला मोठं करायचं आहे, माझ्या पोरांना मोठं करायचं आहे. मला वेदना होत आहेत. समाजाचा अपमान होईल, मान खाली जाईल असं वागू नका."

 
Comments
Add Comment