
मुंबई: दिनांक २७ ऑगस्टपासून (Ganesh Chaturthi 2025) सुरू झालेल्या गणेशोत्सवाची धामधूम आणखीन काही दिवस राज्यभरात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, मोठ्या उत्साहात घरोघरी विराजमान झालेल्या पाच दिवसाच्या गणपतीचे आज विसर्जन करण्यात आले. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषाने आणि जड अंतःकरणाने मुंबईकरांनी बाप्पाला निरोप दिला. दरम्यान, मुंबईतील सर्व चौपाट्या, तलाव परिसरात विसर्जनासाठी भाविकांनी दुपारपासून गर्दी केली होती.
अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुका काढण्यात आल्या, तर फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला. मुंबईच्या चौपाट्यांवर तसेच घरगुती बाप्पाच्या मूर्तीसाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू राहिले.
यादरम्यान, गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा मुंबईच्या प्रमुख चौपाट्यांवर आणि तलावावर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. ज्यात विद्युत रोषणाई, निर्माल्य संकलनासाठी कुंड आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ज्येष्ठा गौरी पूजन
आज घरगुती पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले, पण आज अनेकांच्या घरी गौराईचे आगमन झाले आहे, त्यानुसार उद्या अनेक ठिकाणी ज्येष्ठा गौरी आवाहन साजरा केला जाणार असून, तिसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सात दिवसांच्या गणपतींसोबत विसर्जन केले जाईल. त्यामुळे अजून दोन दिवस मुंबईच्या चौपाट्यांवर भाविकांची गर्दी असणार आहे.