
पुणे: गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सिल्व्हर रॉक्स, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर येथील निवासस्थानी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि त्यांची भगिनी श्रीमती जेहलम जोशी यांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. या प्रसंगी घरातील आरास पर्यावरणपूरक ठेवण्यात आली होती. जवळपास ५० वर्षांची ही परंपरा त्यांच्या आई-वडिलांनी – डॉ. दिवाकर गोऱ्हे व सौ. लतिका गोऱ्हे – यांनी सुरू केली होती आणि आजही ती भावपूर्णपणे पुढे नेली जात आहे.
पर्यावरण पूरक आरास
नीलम गोऱ्हे यांच्या पुणे येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायला पर्यावरणपूरक अशी आरास करण्यात आली आहे. तसेच एका बाजूला सोनेरी मोदक ठेवयात आले, जे भारताच्या समृद्धीचे प्रतीक असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. तर गणरायाच्या पाठीमाग्गे धनुष्यबाण व त्रिशूलाची सजावट करण्यात आली, ज्याद्वारे सामर्थ्य आणि श्रद्धेचा संगम व्यक्त करण्यात आला. ही आरास केवळ सजावट नसून श्रद्धा, कृतज्ञता आणि प्रगतीची प्रार्थना असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
निलम गोऱ्हे यांनी गणरायाच्या चरणी प्रार्थना करताना शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाची मनोकामना केली. “या वर्षी पाऊस समाधानकारक झाला असला तरी काही भागांत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बळीराजाला सुख-समाधान मिळो, शेतीच्या उत्पादनास योग्य भाव मिळो आणि नवी उभारी घेण्यासाठी बाप्पाचे आशीर्वाद लाभोत. तसेच विद्यार्थी, महिला आणि कामगार यांचे जीवन सुजलाम-सुफलाम व्हावे,” असे त्यांनी नमूद केले.
महिलांच्या सुरक्षिततेवर भर देत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “‘लाडकी बहीण योजना’ ही महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची दिशा आहे. गावपातळीवर महिलांना सुरक्षितता, नेतृत्व आणि प्रगतीची संधी मिळावी, ही आमची गणरायाकडे प्रार्थना आहे.”
राज्याच्या महायुती सरकारसाठी प्रार्थना करताना त्यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सर्वांगीण विकासाच्या मार्गावर आहे. या तिघा नेत्यांमध्ये कायम जिव्हाळा , मैत्री आणि सलोखा टिकून राहावा, जेणेकरून ते एकसंघपणे कार्य करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकतील.” त्याचबरोबर, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला जागतिक पातळीवर प्रगती व सामर्थ्य प्राप्त होवो, अशीही त्यांनी प्रार्थना केली.
गणरायाच्या आगमनानंतर लवकरच गौरी पूजनाचा मंगल सोहळा होणार असून कौटुंबिक ऐक्य आणि समाजातील स्त्रीशक्तीचे प्रतीक म्हणून तो साजरा केला जाणार आहे.