
पालघर: वसई तालुक्यातील नारंगी रोड वरील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत लगतच्या चाळीवर कोसळल्यामुळे आज सकाळी मोठी दुर्घटना घडली. त्यामध्ये अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी, वसई विरार महानगर पालिका अग्निशामक दल आणि एनडीआरएफचे दोन टीम सकाळपासून काम करत होते. त्यावेळी सकाळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एक वर्षाची चिमूरडी आणि तिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी आली होती, तर ११ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले होते. या सर्वांना विरार आणि नालासोपारा येथील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरीसुद्धा अजून काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याकारणामुळे बचावकार्य संध्याकाळपर्यंत सुरूच राहिले. त्यानंतर अखेरीस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. त्याद्वारे एकूण ७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.
या संदर्भात मिळालेल्या महितीनुसार, आज (२७ ऑगस्ट) संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १४ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला असून त्यामधील ३ जणांची ओळख पटली आहे, तर बाकीची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. या दुर्घटनेत एकूण ९ जण जखमी झाले आहेत.
मृतांची नावे
दुर्घटनेत लक्ष्मण सिंग (२६ वर्ष), आरोही ओंकार जोवील (२४ वर्षे), उत्कर्षा जोवील (१ वर्षे), दिनेश सकपाळ (४३ वर्ष), सुप्रिया निवळकर (३८ वर्ष), अर्णव निवळकर (११ वर्ष) यांचा मृत्यू झाला असून एकाची ओळख पटवण्याचे काम चालू आहे.
जखमींची नावे
जखमींमध्ये प्रभावकर (५७), प्रमिला प्रभाकर शिंदे (५०), प्रेरणा शिंदे (२०), प्रदीप कदम (४०), जयश्री कदम (३३), मिताली परमार (२८), संजय स्वपंत सिंग (२४), मंथन शिंदे (१९), विशाखा जोवील (२४) यांचा समावेश असून, त्यांच्यावर वसई, नालासोपारा व विरार येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यापैकी ३ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, ६ जणांवर उपचार सुरू आहेत.