
२४ तासांत अन्नछात्र काढण्याचा आदेश
मुंबई : आजपासून गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2025) आरंभ झाला असून, गणरायचा स्वागतासाठी गणेशभक्तांचा उत्साह ओथंबून वाहत आहे. केवळ कोकण किंवा मुंबई नव्हे तर संपूर्ण राज्यभर गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असतानाच मुंबईचा सर्वात प्रतिष्ठित गणपती लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाबाबत एक बातमी समोर येत आहे. यावर्षीचा लालगबाग राजा अनेक कारणांसाठी वेगळा असल्याची चर्चा तर होत होती, पण आता यावर्षीच्या काही गोष्टींमुळेच या मंडळाला BMC ची नोटिस मिळाल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईसह राज्यातील अनेक भक्त लालबागच्या राजाची प्रतीक्षा करत असतात. ,लालबागचा राजा नवसाला पावतो, भक्तांच्या हाकेला धावतो अशी गणेश भक्तांमध्ये धारणा आहे. त्यामुळे दरवर्षी लालबागच्या राजाचे दर्शन घेणाऱ्या भक्तांची गर्दी वाढतच चालली आहे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवसांमध्ये तर ही गर्दी खूपच वाढत जाते, अगदी एक दिवसांआधीपासूनच दर्शनाची रांग लावली जाते. याच पार्श्वभूमीवर, यंदा गणेशभक्तांसाठी प्रसाद म्हणून जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आणि त्यासाठी अन्नछत्र देखील उभारले. मात्र येणाऱ्या भक्तांची सुरक्षिता पाहता मुंबई पोलिसांसह, अग्निशमन दलाने दिलेल्या नकारानंतरही उभारणी केल्याने त्याआधारे मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण वॉर्डकडून जागेच्या मूळ मालकांनाच नोटीस बजावण्यात आली आहे.
२४ तासांत करावी लागणार गोष्ट
२४ तासांत अन्नछत्र काढा, अन्यथा कारवाई करून काढण्यात येईल, असा इशारा BMC कडून देण्यात आला आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी लालबागचा राजा मंडळाकडून आदेशाचे पालन होत आहे की नाही, याची प्रतीक्षा मुंबई महापालिका करत आहे.
अन्नछत्र कुठे उभारले आहे?
लालबागमधील पेरू कंपाऊंडमध्ये राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी तीन अन्नछत्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या अन्नछत्रात होणारी गर्दी आणि त्यामुळे संभाव्य चेंगराचेंगरीचा प्रकार तसेच अन्य अनुचित घटना घडू नये, या दृष्टीने त्याला मुंबई पोलिसांसह अग्निशमन दलानेही परवानगी देण्यास नकार दिला होता. तरीही लालबागचा राजा मंडळाकडून अन्नछत्र उभारण्यात आले. त्यामुळे BMC द्वारे कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
अन्यथा महापालिका कारवाई करणार
मुंबई पोलिस आणि अग्निशमन दलाने परवानगी नाकारल्यानंतरच ही नोटीस वॉर्डकडून बजावण्यात आल्याचे सांगितले. एकावेळी ५०० पेक्षा जास्त जण या अन्नछत्रात प्रसाद घेऊ शकतील, अशी व्यवस्था केली जात होती. मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव ती नाकारण्यात आली. सध्या ही जागा एका विकासकाच्या ताब्यात आहे. त्यामुळे एफ दक्षिण वॉर्डने नोटीस मालकालाच बजावून अन्नछत्र काढा, असे स्पष्ट केल्याचे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.