Tuesday, August 26, 2025

व्होटचोरीचा आरोप मविआला भोवणार ? मविआ जिंकलेल्या ठिकाणी दुबार मतदार नोंदणी झाल्याचे आरोप

व्होटचोरीचा आरोप मविआला भोवणार ? मविआ जिंकलेल्या ठिकाणी दुबार मतदार नोंदणी झाल्याचे आरोप

मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेला व्होटचोरीचा आरोप मविआला भोवण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीने जिंकलेल्या मतदारसंघातच दुबार मतदार नोंदणी झाल्याच्या तक्रारी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी केल्याचे उघड झाले आहे. मानखुर्द शिवाजीनगर, मालाड पूर्व आणि मुंब्रा कळवा या मतदारसंघात किमान १० हजार ते ३० हजार दुबार मतदार नोंदणी केल्याचा आरोप करण्यात आला असून, लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यान ३० ते ५० हजार मतदारांची नोंदणी वाढल्याची धक्कादायक माहिती तेथील प्रतिस्पर्धी उमेदवार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

मानखुर्द, शिवाजीनगर या मतदारसंघात २०२४ मध्ये मतदारयाद्या पडताळणीदरम्यान तब्बल ३२ हजार मतदारांची अचानक वाढ नोंदविण्यात आली. या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अबू आझमी हे १२ हजार मतांनी निवडून आले. मतदारसंघात प्रत्येक प्रभागात किमान दोन ते तीन हजार बनावट मतदार आढळले. जवळपास ५० टक्के मतदार हे उत्तर भारतातही मतदार आहेत आणि इथेही स्थलांतरित झालेल्यांनी मतदान केल्याचे असल्याचे आम्ही उघड केले होते. याविषयी विजयी उमेदवारांनी कधी तक्रारी केल्याचे ऐकिवात नाही; असे ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन’चे अतिक अहमद खान म्हणाले. ते अबू आझमी यांच्या विरोधात निवडणुकीत उभे होते.

मालाड पूर्वमध्ये काँग्रेसचे अस्लम शेख यांचा ६,२२७ मतांनी विजय झाला तर, भाजपचे विनोद शेलार हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. या मतदारसंघात लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यान ५० हजारांहून अधिक मतदार वाढल्याचा दावा विनोद शेलार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात ३१,२३४ मतदारांच्या समावेशाबाबत हरकत उपस्थित केली होती. याबाबत आव्हाड यांना याविषयी विचारले असता, ‘माझ्या मतदारसंघात तब्बल २७ हजार बोगस नोंदणी झाल्याची तक्रार मी स्वतः केली होती’, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा