
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत पूर आला आहे. जम्मूतील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आणि १४ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने कटरा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जमीन खचल्यामुळे वैष्णोदेवी यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. अर्द्धकुमारीजवळ दरड कोसळली आणि जीवितहानी झाली. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सततच्या पावसामुळे रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा टेकड्यांवर असलेल्या माता वैष्णो देवी मंदिराच्या मार्गावर मंगळवारी दुपारी भूस्खलन झाले. या अपघातात अनेक जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेनंतर प्रसिद्ध मंदिराची तीर्थयात्रा थांबवण्यात आली आहे. अर्द्धकुमारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ दुपारी 3 वाजता भूस्खलन झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, डोंगरावर असलेल्या मंदिराकडे जाणाऱ्या बारा किलोमीटरच्या वळणावळणाच्या मार्गावर साधारणपणे अर्ध्या वाटेवर ही घटना घडली.
हिमकोटी मार्गावरील यात्रा सकाळपासूनच स्थगित करण्यात आली होती. पण दुपारी दीड वाजेपर्यंत जुन्या मार्गावरील यात्रा सुरू होती. मात्र, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी पुढील आदेश येईपर्यंत या मार्गावरील यात्राही स्थगित केली आहे. डोडा येथे ढगफुटीमुळे तवी नदीने रौद्र रूप धारण केले आहे. सततच्या जोरदार पावसामुळे जलाशयांमध्ये पाणी साचल्याने चौथ्या तवी पुलाजवळील रस्ता वाहून गेला आहे. डोडा येथे पाऊस आणि पुरामुळे चार लोकांचा मृत्यू झाला आहे.
अनेक भागांतील घरांचे आणि इतर मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आहे. बचाव व मदतकार्य सुरू आहे. अधिकाऱ्यांनी रहिवाशांना, विशेषतः सखल आणि डोंगराळ भागांत राहणाऱ्या लोकांना, थांबून-थांबून होत असलेल्या पावसामुळे सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जम्मू विभागातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना २७ ऑगस्टपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही खबरदारीचा उपाय म्हणून थांबवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला असून, लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.