
अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अहमदाबाद येथे दिले. अमेरिका भारतावर २७ ऑगस्टपासून ५० टक्के टॅरिफ लादत असतानाही, भारतातील शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान म्हणाले की, कितीही दबाव आला तरीही माझे सरकार लघू उद्योजक, शेतकरी आणि पशुपालकांचे हित जपेल. आम्ही सहनशक्ती वाढवत आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचे नुकसान होणार नाही याची मी खात्री देतो असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा आणि काँग्रेसच्या धोरणांचा उल्लेख करत सांगितले की, जगाने पाहिले आहे की आम्ही पहलगाम नरसंहाराचा बदला २२ मिनिटांत घेतला.
गुजरात ही दोन मोहनांची भूमी आहे – सुदर्शनधारी आणि चरखाधारी. एकाने देशाला सैन्यशक्तीचे प्रतीक बनवले, तर दुसऱ्याने आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला. पंतप्रधान मोदी हे २५ आणि २६ ऑगस्ट रोजी गुजरातच्या दौऱ्यावर असून, त्यांनी अहमदाबादमध्ये सुमारे 3 किलोमीटरचा रोड शो केला. नरोडा ते निकोल मार्गावर झालेल्या या रोड शोमध्ये त्यांनी जनतेला हात हलवत अभिवादन केले.
यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधानांनी या दौऱ्यात 5477 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामध्ये साबरमती ते काटोसनदरम्यान धावणाऱ्या नव्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.