
वाहनांवर काटेकोर लक्ष
रायगड : गणेशोत्सव काळात मुंबई–गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात. त्यामुळे दरवर्षी या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र, यावर्षी ही परिस्थिती बदलताना दिसत आहे. कारण महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापनासाठी प्रथमच अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. खारपाडा आणि पाली येथे एएनपीआर कॅमेरे आणि आधुनिक नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून, त्याच्या माध्यमातून महामार्गावरील प्रत्येक वाहनावर सतत लक्ष ठेवले जात आहे.
मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतुकीची समस्या नवी नाही. गेली अनेक वर्षे गणेशोत्सवाच्या काळात या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांमुळे या मार्गावरील प्रवास ५ ते ६ तासांऐवजी १२ ते १४ तासांपर्यंत लांबतो. परिणामी, गणेशभक्तांसह प्रवाशांचा प्रवास त्रासदायक ठरतो. मात्र, यंदा परिस्थितीत बदल घडवण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांनी आयए टेक्नॉलॉजीचा आधार घेतला आहे.
अॅटोमॅटीक नंबर प्लेट रेकग्नायझेशन कॅमेरे बसवून महामार्गावरील वाहतुकीवर काटेकोर लक्ष ठेवले जात आहे. वाहनांचा वेग, वाहनांची ओळख, ट्रॅफिकची घनता याची माहिती थेट नियंत्रण कक्षात पोहोचते. त्यानुसार लगेच वाहतूक वळवली जाते आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. यामुळे यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी, मागील वर्षांच्या तुलनेत कोंडी कमी जाणवत आहे.