मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त ५२ फुट उंचीचे हुबेहुब काशी विश्वनाथ मंदिर साकारण्यात येते आहे. शिवाय राज्य महोत्सव म्हणून विविध उपक्रम या मंडळातर्फे राबविण्यात येणार आहेत.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार हे प्रमुख सल्लागार असलेल्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावर्षीचे ३० वे वर्ष असून दरवर्षी एक प्रसिध्द मंदिराची आरास या मंडळातर्फे केली जाते. गतवर्षी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक मंदिर तर त्यापुर्वी उज्जेन येथील महाकाल मंदिर, केदारनाथ मंदिर, पशुपतीनाथसह महाराष्ट्रातील विठ्ठल मंदिर, शिर्डिचे साई समाधी मंदिर अशी विविध मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात आली होती. तर मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात लोकामन्य बाळा गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील वाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती.
विविध जाती धर्मियांची वस्ती असलेल्या रेक्लमेशन येथे हा गणेशोत्सव साजरा होत असून या उत्सवात सर्वधर्मिय सहभागी होतात आणि मोठया उत्साहात हा उत्सव साजरा करतात हेही त्याचे वैशिष्ट. तसेच दरवर्षी चित्रपट, क्रिडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जुन येतात त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळामध्ये हे मंडळ लक्षवेधी ठरले आहे.
काय आहे यावर्षीची संकल्पना?
श्री काशी विश्वेश्वर हे बारा ज्योतिलिंगंपैकी एक आहे. हे मंदिर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे असून मंदिर पवित्र गंगा नदीच्या पश्चिम तीरावर आहे. क्रूर आक्रमक तुद्दीन ऐबक याने हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर पाडले. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली अनेक शतके गेल्यानंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले.
हिंदूधर्मानुसार, काशी विश्वनाथ मंदिराला भेट देणे आणि गंगेत स्नान करणे हे मुक्ती किंवा मोक्षाच्या मार्गावरील महत्वाचे टप्पे आहेत.या शहरात सुमारे १६५४ मंदिरे आहेत. त्यामुळे याला मंदिराचे शहर असेही म्हणतात. त्यात प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचे आहे. इतर देवतांच्या लहान लहान मंदिरांनी हे मंदिर वेढले गेले आहे. उत्तर भारतातील मंदिरांप्रमाणेच काशी विश्वनाथ मंदिरही नागर शैलीत बांधण्यात आले आहेः मंदिराच्या गर्भगृहाच्या ईशान्य कोपऱ्यात काशी विश्वनाथांची मुख्य शिव पिंडी आहे, त्यावर गंगाजल व बिल्वपत्रे वाहण्यात येतात. ते काळ्या पाषाणाचे व सोन्या-चांदीने मढविले आहे. त्याच मंदिराची हुबेहुब प्रतिकृती वांद्रे येथे साकारण्यात आली आहे.
मंदिराचा कळस, वैशिष्टपुर्ण असलेले खांब, विश्वेश्वराची पिंड या सगळयाची हुबेहुब प्रतिकृती साकरली जाणार आहे. यासोबतच या संपुर्ण परिसरात दिव्यांची खास रोशणाई करण्यात आली असून तरुणांसाठी ही रोशणाई खास आकर्षण ठरणार आहे. दरवर्षी मंदिर आणि ही रोशणाई पाहण्यासाठी मोठी गर्दी होते तसेच याही वर्षीची आरास गणेशभ्क्तांना नक्की आवडेल असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्य शासनातर्फे गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्या १२ गडकिल्ले यांना जागतिक युनोस्कोचा दर्जा मिळाला त्या निमित्ताने या किल्यांच प्रदर्शन, ऑपरेशन सिंदूर आणि स्वदेशी याबाबतही जनजागृती करण्यात या मंडळाचा पुढाकार राहणार आहे.