
मुंबई : भूम-परांडा-वाशी मतदारसंघाचे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना फडणवीस सरकारने मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही. यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर काही दिवसांतच तानाजी सावंत राजकीयदृष्ट्या अज्ञातवासात गेल्याचे चित्र निर्माण झाले. पण आता परिस्थिती बदलणार असल्याची चर्चा आहे.
काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे मध्यंतरीच्या काळात तानाजी सावंत चर्चेत होते. पण या वक्तव्यांमुळे त्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता परत धूसर झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तानाजी सावंत आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळीक पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरी एकनाथ शिंदे आणि सावंत यांची चर्चा झाली होती. नंतर सावंत आणि शिंदे यांच्यातील अंतर कमी झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईला तातडीच्या भेटीचा निरोप आला आणि त्यांची तात्काळ भेट घेतल्याची फेसबुक पोस्ट तानाजी सावंत यांनी केली. या पोस्टमुळे लवकरच तानाजी सावंतांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत दोन तास विविध राजकीय घडामोडींवर आणि राज्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाल्याची फेसबुक पोस्ट तानाजी सावंत यांनी केली आहे. या पोस्टमुळेच तानाजी सावंतांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर आले होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू दीपक टिळक यांच्या निधनानंतर त्यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर रात्री उशिरा शिंदे यांनी कात्रज येथे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. सावंत यांच्यावर ॲंजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाल्याने शिंदे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीदरम्यान शिंदे आणि सावंत यांच्यात जवळपास एक तास बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे तानाजी सावंतांच्या बाबतीत कोय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.