
मुंबई : मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पार्किंगच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आता अमित राज ठाकरे यांनी शेलारांची भेट घेतली. यामुळे मनसे आणि भाजप यांच्यात नवी राजकीय समीकरणं तयार होत आहेत का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, गणेश उत्सव कालावधीत शाळा व महाविद्यालय परीक्षा वेळापत्रक तात्पुरते रद्द करून पुढे ढकलण्याची मागणी अमित ठाकरेंनी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली. या व्यतिरिक्त आणखीही काही मागण्या अमित ठाकरेंनी निवेदनाद्वारे मंत्री आशिष शेलार यांना सादर केल्या.
गणेशोत्सव हा फक्त धार्मिक नाही तर सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचा सण आहे. विद्यार्थ्यांनी कुटुंबासोबत तसेच समाजासोबत हा सण साजरा करायला हवा. यानिमित्ताने प्रत्येकाची समाजाशी असलेली नाळ आणखी घट्ट होण्यास मदत होणार आहे. हे लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही आमची ठाम अपेक्षा आहे. अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्यभरात कुठेही गणेशोत्सव काळात परीक्षा होऊ देणार नाही. त्यासाठी आम्ही आवश्यक तेवढे तीव्र आंदोलन करू यात काही शंका नाही, असा इशाराही अमित ठाकरेंनी पत्राद्वारे दिला आहे.
अमित ठाकरेंच्या प्रमुख मागण्या
- राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये यांनी गणेशोत्सव काळात परीक्षांचे आयोजन करणे टाळावे. आधीच जाहीर केलेल्या परीक्षा असल्यास त्या पुढे ढकलाव्या.
- गणेशोत्सव काळात परीक्षा घेणाऱ्या शिक्षण संस्थांवर सरकारने कारवाई करावी
- विद्यार्थ्यांना गणेशोत्सवात सहभागी होण्यासाठी शासनाने तसेच शिक्षण संस्थांनी प्रोत्साहन द्यावे