
येत्या ०४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना नोंदवता येणार हरकती, सूचना
मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरता बनवण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या आराखड्याला नगरविकास खाते आणि निवडणूक विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर हे आराखडे जनतेसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. प्रारुप प्रभाग रचनेचे आराखडे जनतेला हरकती आणि सूचनांसाठी प्रसिध्द करण्यात आले असून जनतेला गुरुवार ०४ सप्टेंबरपर्यंत आपल्या हरकती व सूचना नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे.
या प्रभागांची रचना करताना सीमांमध्ये फारसा बदल न झाल्याने याबाबत हरकती आणि सूचना कमी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांच्या हरकतींसाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ देण्याची मागणी अथवा ती मागणी मान्य होण्याची शक्यताही फार कमी असेल असे बोलले जाईल.
सध्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचनेचे अथार्त प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करून त्याचा प्रारुप आराखडा मुंबई महापालिकेच्यावतीने बनवण्यात आला आहे. या सुधारित प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बनवण्यात आल्यानंतर नगरविकास खाते आणि निवडणूक आयोगाला सादर करण्यात आल्यानंतर त्यांच्या मंजुरीनंतर महापालिकेने मुंबईच्या पुनर्रचना केलेल्या प्रभागांचे नकाशे प्रसिध्द करून येत्या २२ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर २०२५ दरम्यान जनता आणि पर्यायाने राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून हरकती आणि सूचना नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
या हरकती व सूचना महापालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबधित प्रशासकीय कार्यालयातील करनिर्धारण व संकलन विभागात ०४ सप्टेंबर २०२५ पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत नोंदवता येणार आहे.
महत्वाचे म्हणजे गणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ०६ सप्टेंबर २०२५ पर्यंत असून याच कालावधीमध्ये म्हणजे २२ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये हरकती व सूचना मांडण्याची मुदत असल्याने राजकीय पक्षांना नेत्यांचे आणि माजी नगरसेवक तथा इच्छुक उमेदवारांचे लक्ष हे उत्सवा ऐवजी प्रभागांच्या रचनेवरच अधिक राहणार आहे.