
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात आली आहे. मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सालाबादाप्रमाणे यावर्षीही मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल दोन विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. त्यामधील एक ट्रेन आज मंत्री नितेश राणे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थिती सुटली असून उद्या रविवारी देखील ट्रेन सोडण्यात येणार आहे.
पुढच्या आठवड्यात प्रत्येकाच्याच घराघरात आणि मंडळात गपणतीचे आगमन होणार आहे.त्यामुळे आतापासूनच कोकणकरांनी आपआपली गावं गाठायला सूरूवात केली आहे. विशेष बाब म्हणजे या प्रवासात प्रवासी भक्तांसाठी मोफत जेवणाची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. कोकणवासियांसाठी ही दिलासादायक बाब आहे. महत्त्वाचं म्हणजे ह्या उपक्रमाचे हे १३वे वर्ष असून यंदा कोकणवासियांच्या सेवेसाठी विशेष दोन ट्रेन सज्ज झाली आहेत.
अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करणारी ही 'मोदी एक्स्प्रेस' कोकणवासीयांसाठी एक पर्वणी ठरली आहे. "या 'डबल धमाका' विशेष मोदी एक्स्प्रेसचा सर्व कोकणवासीयांनी लाभ घ्यावा आणि आपला गणेशोत्सवाचा प्रवास सुखाचा करावा," असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
या उपक्रमामुळे सणांच्या दिवसात होणारी गर्दी आणि खासगी वाहतुकीचा खर्च टाळून हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे प्रशासनाकडूनही अनेक जादा रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र अनेक रेल्वे गाड्यांचे बुकिंग आधीच फूल्ल झालं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणातील राणे कुटुंबीयांकडून मुंबईतून थेट गावी जाण्यासाठी स्पेशल दोन रेल्वे गाड्या सोडल्या गेल्या आहेत.
नुकतीच या दोन्ही मोदी एक्सप्रेस गाड्यांची घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली होती. या उपक्रमाचे हे १३वे वर्ष आहे. गणेशोत्सव 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान साजरा होणार असून, 11 ऑगस्टपासून गणपती विशेष रेल्वे सेवा सुरू झाल्या आहेत. या विशेष रेल्वे सेवांचा विस्तार कोकण रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर झाला आहे. या विशेष रेल्वेगाड्यांचे थांबे वाढविले आहेत.