Saturday, August 23, 2025

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड रस्ता, तसेच काँक्रीट व पेवर ब्लॉकमधील मोठे गॅप यामुळे दुचाकी घसरून एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मृत डॉक्टरांचे नाव डॉ. मोहम्मद नशीम अन्सारी (वय ५८) असे असून, ते आपल्या घराकडे परतत असताना हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “रस्त्यामुळे जीव गमवावा लागत असेल, तर जबाबदार कोण?” असा संतापजनक सवाल लोकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, भिवंडीतील वाईट रस्त्यांच्या कारणामुळे आतापर्यंत किमान ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तरीदेखील स्थानिक प्रशासन व ठेकेदारांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. रस्त्यांची अशीच दुरवस्था कायम राहिली, तर आणखी कित्येक जीव धोक्यात येतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

रस्त्यावरील गॅप आणि असमतोलाचा बळी

वंजारपट्टी नाका परिसरातील सिराज हॉस्पिटलजवळ शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात घडला. ढाब्यावर जेवण करून घरी परतत असताना दुचाकी घसरून एका डॉक्टरांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत डॉक्टर आपल्या एक्टिवा स्कुटरवरून घरी परतत होते. मात्र रस्त्यावरील असमतोल गॅप, उघडखाबड पृष्ठभाग आणि अंधारामुळे दुचाकी घसरली. अपघात एवढा गंभीर होता की डॉक्टर गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सिराज हॉस्पिटलजवळील रस्त्यांची दुरवस्था वारंवार स्थानिकांकडून मांडली जात असली तरी, संबंधित विभाग आणि प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. या रस्त्यामुळे गेल्या काही महिन्यांत तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांनी सांगितले असून, “आता तरी प्रशासन जागे होणार का?” असा ज्वलंत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सिराज हॉस्पिटलसमोर दुचाकी घसरली

मोहम्मद नशीम अन्सारी (वय ५८) हे आपल्या एक्टिवावरून घरी जात असताना दुचाकी घसरली आणि मागून येणाऱ्या कंटेनरखाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. वंजारपट्टी नाका येथील एपीजे अब्दुल कलाम उडान पुलावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याने अवजड वाहनांची वाहतूक पुलाऐवजी खालून वळवण्यात आली होती. या दरम्यान दुचाकी घसरल्याने थेट कंटेनरच्या चाकाखाली जाऊन डॉक्टरांचा दुर्दैवी अंत झाला. अपघातानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला. अवजड वाहन वाहतूक बंद करण्याची मागणी करत स्थानिकांनी रस्ता रोको आंदोलनही केले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे. दरम्यान, कंटेनर चालक मोहम्मद बिलाल मोहम्मद अस्लम (वय ३०) याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, रस्त्यांच्या दुरवस्थेवर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.

 

भिवंडीत खड्ड्यांमुळे आतापर्यंत ३ जणांचा बळी

भिवंडीतील रस्त्यांवरील खड्डे पुन्हा एकदा मृत्यूचे कारण ठरले आहेत. शहर आणि ग्रामीण भागात खड्ड्यांमुळे आतापर्यंत तब्बल तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याआधी दोन निरपराध नागरिकांचे प्राण गेले होते, आणि आता एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “प्रशासनाच्या कुंभकर्णी झोपेचा अंत कधी होणार?”, असा सवाल स्थानिक करत आहेत. प्रत्येक वेळी जीव गेल्यानंतरच खड्ड्यांवर डांबर टाकून डागडुजी केली जाते, ही गंभीर शोकांतिका असल्याची भावना जनतेमध्ये आहे. या घटनेने केवळ एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला नाही, तर संपूर्ण भिवंडीकरांच्या मनात भीती आणि आक्रोश निर्माण झाला आहे. नागरिकांनी भिवंडी महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागावर (PWD) निष्क्रियतेचा आरोप करत जोरदार टीका केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, नागरिकांनी कायमस्वरूपी उपाययोजना होईपर्यंत आंदोलनाची भूमिका घेण्याची तयारी दाखवली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >