खासदार नारायण राणे यांचे आवाहन
मुंबई : सार्वजनिक जीवनात व राजकारणात काम करताना मला मिळालेल्या पदांना मी न्याय देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असताना राज्यात व देशात मला जो नावलौकिक मिळाला, त्यामागे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा निर्णय होता, हे मला सांगताना आजही अभिमान वाटतो. मला दिलेल्या संधीचा उपयोग मी नेहमीच जनतेच्या कल्याणाकरिता सामाजिक, शैक्षणिक व विधायक कामांसाठी केला. या काळात कोकणचा खूप विकास झाला, आताही होत आहे, पुढेही होईल असे उदगार खासदार नारायण राणे यांनी मुंबईत काढले. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने आयोजित वृत्तपत्र लेखक दिनाच्या कार्यक्रमात ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. ७७ व्या दिनानिमित्त रवींद्र मालुसरे यांनी संपादित केलेल्या ‘प्रेरक शिल्पकार’ या ग्रंथाचे आणि वृत्तपत्र लेखकांनी सोशल मीडियावर मुक्तपणे आणि निर्भीडपणे व्यक्त व्हावे यासाठी बनविलेल्या ‘जागल्यांचा लोकजागर’ या ब्लॉगरचे प्रकाशन नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
राणे आपल्या भाषणात पुढे असेही म्हणाले की, मळलेल्या वाटेने जाण्यापेक्षा यशस्वी झालेल्यांपासून स्फूर्ती घेऊन कोकणातील युवकाने पुढे जायला हवे. आयएएस आणि आयपीएसचे प्रमाण अत्यल्प आहे ते भविष्यात वाढायला हवे. त्यासाठी लागणारी संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी मी तयार आहे. मुलांनी उच्च शिक्षित व्हावे यासाठी मी सिंधुदुर्गात मेडिकल, इंजिनिअर कॉलेज काढले आहे. त्याची गुणवत्ता आता दिसत आहे. यापुढे आर्किटेक्ट असो किंवा अन्य कुणीही त्यांनी आयुष्यातील अपयशाच्या तक्रारीचा सूर न लावता आपली चाकोरी सोडून बाहेर पडायला पाहिजे तरच अधिक पैसे आणि नावलौकिक मिळेल. संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
सिंधुदुर्गच्या विकासासाठी पदाचा वापर
देशाच्या तिजोरीत मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असलेले शहर ३४ टक्के हिस्सा उचलते. याचा विचार मुंबई लगत असणाऱ्या कोकणी माणसांनी केला पाहिजे. कोकण हे समृद्ध बनले पाहिजे. मला राज्यात व केंद्रात जी-जी पदे मिळाली, त्याचा उपयोग मी महाराष्ट्राच्या व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासासाठी केला, हे सांगताना मला अभिमान वाटतो.कोकणाच्या विकासाची अशी चर्चा होते, त्यामध्ये माझ्या नावाचाही उल्लेख होतो. त्याचे सर्व श्रेय मी कोकणी माणसालाच देतो. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या कार्यालयीन जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मी सरकारमध्ये असल्याने तुमच्या या मागणीसाठी मी संबंधितांसाठी बोलून तुमचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करील, असे आश्वासनही नारायण राणे यांनी सर्व ज्येष्ठ वृत्तपत्र लेखकांना दिले.