
गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक ठिकाणी अखेर पावसाचा जोर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर आलं आहे. कोयना, पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू आहे. मात्र कालपासून जिल्ह्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे.कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग कमी केल्याने पाटण सह परिसरातील पूर परिस्थिती ओसरली असून जनजीवन पूर्वपदावर आलं आहे. सातारा, वाई,कराड या भागातील नद्यांची पाणी पातळी घट झाली आहे.
मात्र या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वाटाणा घेवडा बटाटा यांसह कडधान्याची ही नुकसान झाल्यामुळे या पिकाच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे मत देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
त्यामुळे तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंचनामे करण्यात यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. सध्या साताऱ्यातील वाहतूक सुरळीत सुरु असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.