
नवी दिल्ली: भारतासाठी एक अत्यंत चिंताजनक बाब समोर आली आहे. स्विस सायबर सुरक्षा फर्म 'अॅक्रोनिस'ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सायबर हल्ल्यांच्या यादीत भारताने ब्राझील आणि स्पेनला मागे टाकले असून, सायबर हल्लेखोरांचे भारत सर्वात मोठे लक्ष्य बनले आहे.
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये भारतात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वापरणाऱ्या उपकरणांवर होणाऱ्या मालवेअर हल्ल्यांचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. मे महिन्यात हे प्रमाण १२.४ टक्के होते, जे जूनमध्ये वाढून १३.२ टक्क्यांवर पोहोचले आहे. हा आकडा जगभरातील देशांपेक्षा जास्त आहे.

नवी दिल्ली: बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरावृत्ती (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेसाठी आता आधार ...
याशिवाय, अधिकृत ईमेलवर होणाऱ्या सायबर हल्ल्यांमध्येही वाढ झाली आहे. २०२४ च्या सुरुवातीला २० टक्के असलेले हे हल्ले २०२५ च्या पहिल्या सहामाहीत २५.६ टक्क्यांवर पोहोचले आहेत. सायबर गुन्हेगार आता क्रेडिट कार्ड आणि पासवर्डसारखी वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर करत आहेत.
अहवालात असेही म्हटले आहे की, जनरेटिव्ह एआयमुळे सायबर गुन्हेगारांसाठीचे तांत्रिक अडथळे कमी झाले आहेत. यामुळे फिशिंग ईमेल, बनावट इनव्हॉइस आणि अगदी डीपफेक स्कॅमही शोधणे अधिक कठीण झाले आहे. कोविड-१९ नंतरच्या 'हायब्रिड वर्क मॉडेल'मुळे अनेक कंपन्यांच्या सिस्टीम असुरक्षित बनल्या आहेत, असे 'अॅक्रोनिस'चे भारत आणि दक्षिण आशियाचे महाव्यवस्थापक राजेश छाब्रा यांनी सांगितले.
भारतातील उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, सेवा आणि दूरसंचार उद्योग हे सायबर हल्ल्यांच्या सर्वात मोठ्या धोक्यात आहेत. मालवेअर हल्ल्यांद्वारे हॅकर्स डिव्हाइसचा ताबा घेतात. भारताच्या वाढत्या डिजिटल व्यवहारांमध्ये सायबर सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.