Monday, October 20, 2025
Happy Diwali

रत्नागिरीत भरधाव कारने पादचाऱ्याला उडवले, एक गंभीर

रत्नागिरीत भरधाव कारने पादचाऱ्याला उडवले, एक गंभीर

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खवटी नाका येथे मुंबई-गोवा महामार्गावर एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्यावरून चालणाऱ्या एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा अपघात १९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.३० वाजता घडला. मिळालेल्या माहितीनुसार, अनंत वसंत धोत्रे (वय ४५, रा. नातुनगर, खेड) हे आपल्या कामावरून परत येत होते. खवटी नाक्यावरील राम पवार यांच्या सलूनमध्ये दाढी करून ते घरी जाण्यासाठी महामार्ग ओलांडत होते. त्याचवेळी मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या अज्ञात कारने त्यांना धडक दिली.

या धडकेत धोत्रे यांच्या डाव्या हाताच्या बाहूला आणि उजव्या हाताच्या कोपराला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. महामार्गावर पादचाऱ्यांसाठी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment