
मुंबई : कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसच्या नंदू म्हात्रे, जितेंद्र भोईर, हृदयनाथ भोईर यांच्यासह 7 माजी नगरसेवकांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्यासह उबाठाच्या 9 माजी नगरसेवकांनी तसेच पालघर जिल्ह्यातील उबाठा नेते उपेंद्र पाटील यांनीही याच कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते हंसराज अहीर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक, आ. करण देवतळे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी नगरसेवकांनी, विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. या सर्वांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
कल्याण डोंबिवलीचे काँग्रेसचे माजी नगरसेवक हर्षदा भोईर, बुधाराम सरनोबत, शैलेंद्र भोईर, सदानंद म्हात्रे, तसेच वरोरा भद्रावतीचे उबाठा चे माजी नगरसेवक प्रशांत झाडे, प्रमोद नागोसे, सौ. रेखा राजूरकर, लीलाताई ढुमणे, प्रतिभा निमकर, शारदाताई ठवसे आदींचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्यात समावेश आहे. पालघर जिल्ह्यात कामगार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते उपेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली उबाठा गटातील संजय चव्हाण, अमोल पागघरे, मकरंद पाटील, सागर सावंत सिद्धेश्वर उंबरे, सुरेश धोडी, संतोष तरे आदी शेकडो कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.