Thursday, August 21, 2025

स्थानिक प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

स्थानिक प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भीमानदीच्या पुलास पाणी लागले

कर्जत : पुणे जिल्ह्यात मान्सून पावसाच्या जोरदार हजेरीने धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने बुधवार, दि २० रोजी सिद्धटेक (ता.कर्जत) येथील भीमानदीच्या पुलास पाणी लागले असून भीमानदी लगतच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी दिला आहे. सध्या भीमानदी दौंड येथे ९५ हजार ७०० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी सिद्धटेक येथील भीमानदी पात्राची पाहणी करीत स्थानिक प्रशासनास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे जिल्हयात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने जवळपास सर्वच धरणे तुडुंब भरले आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग दौंड येथील भीमानदी पात्रात सोडल्याने कर्जत तालुक्यातील भीमानदी परिसरात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता धरणातून वेगाने पाणी सोडल्याने श्री क्षेत्र अष्टविनायक सिद्धटेक (ता.कर्जत) येथील भीमानदीच्या पुलास पाणी लागले आहे. सद्यस्थितीत भीमा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने परिसरातील नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे. काही शेतात देखील पाणी घुसले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुणे जिल्हा आणि धरण क्षेत्रात पावसाच्या संततधारेने विसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भीमानदी लगत असणाऱ्या बेर्डी, दुधोडी, जलालपूर, भांबोरा, खेड, गणेशवाडी, औटेवाडी, शिंपोरा, बाभूळगाव स्थानिक ग्राम प्रशासनास सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी भयभीत न होता जिल्हा आणि तालुका प्रशासनाच्या सुचनेचे पालन करीत सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केले आहे. सिद्धटेक येथील आपत्ती व्यवस्थापन दक्ष आणि सतर्क ठेवण्यात आले असून प्राप्त सुचनेनुसार आणि मागणीनुसार ते कार्यान्वित राहतील अशी ग्वाही प्रांताधिकारी पाटील यांनी दिली.

पुलास लागलेले पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक हौशी लोकांनी विक्राळ नदीपात्राचे सेल्फी घेत सोशल मीडियावर ठेवले.

ऑगस्ट महिण्यात दोनदा पाण्याखाली जाणे हा योगायोग

सहा वर्षांपूर्वी ५ ऑगस्ट २०१९ साली सोमवारच्याच दिवशी २ लाख ८ क्यूसेक विसर्गाने सिद्धटेक येथील भीमानदीचा पूल पाण्याखाली गेला होता. तदनंतर ५ ऑगस्ट २०२४ रोजी देखील सोमवारच्याच दुसऱ्यांदा सदरचा पूल १ लाख ४० हजार क्यूसेक वेगाच्या विसर्गाने पाण्याखाली गेला होता. मागील दोन-तीन दिवसांपासून पुन्हा एकदा पुणे धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बुधवारी सकाळी ११ वाजता पुलास पाणी टेकले. धरणातून विसर्ग वाढल्यास पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment