Saturday, September 13, 2025

Best Cooprative Bank Election : मुंबईकरांचा कौल ठाम! "मुंबईत ड्युप्लिकेट ब्रँडला नाही थारा", बेस्टच्या रणांगणात भाजपाचा दावा

Best Cooprative Bank Election : मुंबईकरांचा कौल ठाम!

मुंबई : मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्या एकत्रित ‘उत्कर्ष पॅनेल’ला एकही जागा मिळाली नाही. या पराभवामुळे ठाकरे गट आणि मनसे या दोघांनाही मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, शशांक राव यांच्या पॅनेलने १४ जागा जिंकून दणदणीत यश मिळवले. तर भाजप समर्थित ‘सहकार समृद्धी पॅनेल’ने ७ जागा पटकावून आपली मजबूत उपस्थिती दाखवून दिली. या विजयानंतर भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. “मुंबईकर आमचे आहेत आणि मुंबई ही आमचीच आहे,” असे शेलार यांनी म्हटलंय. या निकालामुळे आता ठाकरे गट आणि मनसेला संघटनेच्या पातळीवर आत्मपरीक्षण करावे लागणार आहे, असे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी सोशल मीडियावरून जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नुकतेच एक ट्वीट करून या विजयाला भाजपसाठी मुंबईकरांचा शुभसंकेत म्हटले. “या निवडणुकीत मुंबईकर जिंकले, कामगार जिंकले. कामगारांनी आम्हाला शुभसंकेत दिला आणि फक्त ‘पत’ व ‘पेढी’साठी लढणाऱ्यांना मोठा भोपळा दिला,” असे शेलार यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले. त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गट आणि मनसेवर अप्रत्यक्ष टीका केल्याचे स्पष्ट झाले आहे. बेस्ट पतपेढीच्या निकालातून आता भाजपने मुंबईत आपली ताकद दाखवून दिली असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

बेस्ट पतपेढी निकालावर शेलारांचा घणाघात

या विजयाला मंत्री आशिष शेलार यांनी मुंबईकरांचा आणि कामगारांचा शुभसंकेत असे संबोधले. “बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मुंबईकर जिंकले, कामगार जिंकले. कामगारांनी आम्हाला शुभसंकेत दिला आणि फक्त ‘पत’ व ‘पेढी’साठी लढणाऱ्यांच्या हाती मोठा भोपळा दिला,” असे शेलार यांनी स्पष्ट केले. तसेच, “मुंबईकर, कामगार, श्रमिक आमच्याबाजूने आहेत हे पुन्हा सिद्ध झाले. पक्ष म्हणून आम्ही थेट लढलो नाही, तरी आमचे प्रसाद लाड आणि शशांक राव विजयी झाले, हा तर मोठाच शुभसंकेत आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका होऊनही हा विजय मिळाला आहे,” असे ते म्हणाले. याचबरोबर त्यांनी राजकीय विश्लेषक, मतचोरीचा आरोप करणारे तज्ज्ञ आणि विरोधकांच्या प्रवक्त्यांवर थेट टीका केली. “सगळे उघडे-नागडे झाले आहेत, भर पावसात तोंडावर आपटले आहेत. मुंबईकर ही आमची आणि मुंबई ही आमची,” अशा शब्दांत शेलार यांनी विरोधकांना चिमटा काढला.

'ड्युप्लिकेट ब्रँडला मुंबईकरांचा नकार' : नवनाथ बन

भाजप पक्षाचे प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. “या निकालातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की मुंबईकरांचा आशीर्वाद ड्युप्लिकेट ब्रँडला नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या हिंदुत्वाच्या स्टॅण्डला आहे,” असे बन यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी उबाठावर निशाणा साधत म्हटले, “या निवडणुकीत उबाठाचा पूर्ण पराभव झाला आहे. संजय राऊत मुंबईत ‘आमचाच ब्रँड चालणार’ असे दावे करत होते, पण निकाल लागल्यानंतर त्यांची दातखिळी बसली आहे. नेहमीप्रमाणे EVM आणि व्होट चोरीचे आरोप करण्याची संधीही या वेळी त्यांच्याकडे नाही.” बन यांनी पुढे दावा केला की, “बेस्टच्या निवडणुकीत मुंबईकरांनी थेट मतदानातून उबाठाचा धुव्वा उडवला आहे. या निकालातून हे अधोरेखित झाले आहे की मुंबईत यापुढे केवळ हिंदुत्वाचा खरा ब्रँड विजयी होईल, ड्युप्लिकेट ब्रँडला स्थान मिळणार नाही.”

२१ विरुद्ध शून्य! बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा धुव्वा, प्रसाद लाड यांचा टोला

भाजप नेते प्रसाद लाड यांनीही ट्विटरच्या माध्यमातून ठणकावून प्रतिक्रिया दिली आहे. “या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा २१ विरुद्ध शून्य असा पूर्ण पराभव झाला आहे. याचा सरळ अर्थ असा की, स्वतःला ब्रँडचे बॉस म्हणवणारे एकही जागा जिंकू शकले नाहीत,” असे लाड यांनी ट्वीटमध्ये नमूद केले. या वक्तव्याद्वारे प्रसाद लाड यांनी ठाकरे गटावर थेट राजकीय प्रहार केला असून, बेस्टच्या निकालामुळे मुंबईकरांचा स्पष्ट कौल कोणाच्या बाजूने आहे हे दाखवून दिल्याचा संदेश त्यांनी दिला.

Comments
Add Comment