Wednesday, August 20, 2025

ऐन पावसात अ‍ॅप बेस्ड कॅब सेवांनी केली प्रवाशांची लूट

ऐन पावसात अ‍ॅप बेस्ड कॅब सेवांनी केली प्रवाशांची लूट

मुंबई : मुसळधार पावसामुळे मंगळवारी रेल्वे सेवा पुरती कोलमडली होती. ठिकठिकाणी बेस्टच्या बस पाण्यात अडकल्या होत्या. या परिस्थितीत काही नागरिकांनी प्रवासाचा सुरक्षित पर्याय म्हणून अ‍ॅप बेस्ड कॅब सेवा वापरण्याचा निर्णय घेतला. पण या गरजू प्रवाशांना कंपन्यांनी लुबाडल्याची बाब समोर आली आहे. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियाद्वारे या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या अडचणीचा गैरफायदा घेत हजारो रुपयांचे भाडे अ‍ॅप बेस्ड कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांनी आकारले होते. कल्याण ते सीएसएमटी / चर्चगेटसाठी २,४०० रुपये आणि सीएसएमटी ते ठाणेसाठी १,५०० रुपयांची आकारण्याचे प्रकार घडले. यामुळे पावसाने त्रासलेल्या नागरिकांना सुरक्षित प्रवासाकरिता खिसा रिकामा करण्याची वेळ आली होती.


मिठी नदीला आलेल्या पुरामुळे कुर्ला डेपो परिसरात आणि एलबीएस रस्त्यावर पाणी साचले होते. यामुळे अनेक वाहने अडकली होतो. अंधेरी, कुर्ला घाटकोपर रोड मरोळ नाका, बीपीटी रोडवरील कॉटन फाटक परिसरात दोन फूट पाणी साचले होते. पेडर रोड, महालक्ष्मी मंदिर आणि ताडदेव परीसरात दिड फूट पाणी साचले होते. यामुळे रस्ते वाहतूक बंद होती. रेल्वे सेवा पुरती कोलमडली होती त्यामुळे अनेकांनी लांबच्या प्रवासाकरिता अ‍ॅप बेस्ड कॅब सेवा वापरण्याचा निर्णय घेतला. पण परिस्थितीचा गैरफायदा घेत कॅबवाल्याने थेट दिड ते अडीच हजार रुपयांपर्यंत भाडे आकारले.


एरव्ही बक्कळ नफा कमवणाऱ्या ॲप आधारित कॅब सेवांनी किमान नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ना नफा ना तोटा दरात सेवा द्यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. वाजवी दरापेक्षा अधिक पैसे आकारून प्रवाशांची लूट करणाऱ्यांवर सरकारनेच नियमावली करुन कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांनी केली.


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >