
गोरेगाव येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली
मुंबई: सलग दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर परिसरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. ज्यामुळे वाहतूक आणि रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. मुंबईच्या अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे, ज्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबईच्या पॉश आणि उच्चभ्रू परिसरात देखील पाणी साचले आहे. ज्यात अंधेरी लोखंडवाला तसेच ओबेरॉय जंक्शनसारख्या ठिकाणांचा समावेश आहे. गोरेगाव येथील ओबेरॉय मॉल बाहेरच्या परिसराची अवस्था सध्या जलमय आहे. या परिसरात गुडघाभर पाणी साचले असून, यामुळे होणारी वाहतूक कोंडी व्यवस्थापित करण्यासाठी वाहतूक पोलिस आणि बीएमसी कर्मचारी प्रयत्न करीत आहे.
मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
मुंबई वेस्टर्न एक्सप्रेस हायवेसह अनेक प्रमुख मार्गांवर पाणी साचल्याची नोंद आहे. एक्सप्रेस हायवेवर येणाऱ्या ओबेरॉय जंक्शन येथे पावसाचे प्रचंड पाणी साचल्यामुळे, परिसरातील वाहनांची गती लक्षणीयरीत्या मंदावली आहे, ज्यामुळे मुंबईच्या वाहतूक कोंडीत भर पडली आहे. ज्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Due to waterlogging, vehicular movement is slow at Oberoi Junction. Our personnels and @mybmc staff are present at the location to ease the traffic & assist Mumbaikars. #MTPMonsoonUpdates#MTPTrafficUpdates pic.twitter.com/No4Xx7hUQO
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 19, 2025
या संदर्भात मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विट करत ओबेरॉय जंक्शनवर साचलेल्या पाण्याची पुष्टी केली. "पावसाचे पाणी साचल्यामुळे, ओबेरॉय जंक्शनवर वाहतूक मंदावली आहे. आमचे कर्मचारी आणि @mybmc कर्मचारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि मुंबईकरांना सहाय्य करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहेत." असे ट्विट केले आहे.
मुसळधार पाऊसामुळे मुंबईत वाहतूक कोंडी
सोशल मीडियावर ओबेरॉय मॉलच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दृश्य समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये मॉलसमोर साचलेल्या पावसाच्या पाण्यात मुले पोहताना दिसत आहेत. शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईका त्रस्त झाले आहे, अनेक भागात पाणी साचण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ज्यामुळे मुंबईच्या महामार्गावर वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली पाहायला मिळते आहे. आज सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे गोल देऊळ, गुलालवाडी, वडाळा, शिवडी, नवाब टाकी, नागपाडा, मराठा मंदिर, भायखळा, बावळा कंपाऊंड, भोईवाडा, वडाळा स्टेशन चार रस्ते, हिंदमाता जंक्शन, माटुंगा यासह अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली आहे. सकाळच्या पावसामुळे या भागात दीड ते दोन फूट पाणी साचले आहे, त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
View this post on Instagram
मुंबईत २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस
गेल्या २४ तासांत मुंबई शहरातील अनेक भागात २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे, ज्यामध्ये पूर्व उपनगरातील विक्रोळी येथे २५५.५ मिमी इतका सर्वाधिक पाऊस पडला. या दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. कारण आज असलेल्या उच्च भरतीसोबत कोसळणारा पाऊस पाहता, मुंबईत पुरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार भारतीय हवामान खात्याने आज मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.