
मुंबई: पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे घाट या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याद्वारे देण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे मंत्रालयातून आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज दुपारी २ वाजल्यापासून ते ४ वाजेपर्यंत समुद्राला भरती असल्यामुळे पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या दरम्यान मुंबईत आणखीन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, यामुळे मुंबईच्या सखल भागात आणखीन पाणी साचू शकते. त्यामुळे मुंबईत काही तास पुरपरिस्थितीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे, समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे, तसेच नदी-नाल्यांच्या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स अकाऊंटद्वारे राज्यातील पावसाचा आढावा घेत ट्विट केले आहे. त्यांनी म्हंटले आहे की, "मुंबईत अजूनही पाऊस सुरूच असून आज पहाटे ४ ते सकाळी ११ पर्यंत सरासरी १५० मिमी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. उपनगरात हे प्रमाण अधिक आहे. मिठी नदीची उंची ३.९ मीटर इतकी वाढली असून कुर्ला क्रांतीनगर येथून ३५० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने आढावा घेत असून महापालिका आयुक्त परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत."
ठाण्यात दरड कोसळली, एक जखमी
ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरातील संतोष पाटील नगर येथे असलेल्या घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यात एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
मुंबईची जीवनवाहिनी ठप्प
मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, कल्याण डोंबिवली, बदलापूर, वसई विरार, नवी मुंबईतील वाशी, पनवेल भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी ठप्प झाली आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे. तर पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक देखील काही कालावधीसाठी ठप्प झाली आहे.
मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे, ज्याचा चांगलाच फटका ग्रामीण आणि शहरी भागाला बसला आहे. मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिकपासून ते मराठवाडा आणि विदर्भापर्यंत पावसाने सर्वत्रच हाहाकार माजवला आहे. हवामान खात्याने पुढील ४८ तासांसाठी अनेक भागात रेड अलर्ट जारी केलाय, तर काही ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्टही जाहीर करण्यात आलाय. महाराष्ट्रात आतापर्यंत ६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पाच जण वाहून गेले आहेत. आतापर्यंत तीन जण वाहून गेल्याचे सांगण्यात आले आहे.