
Team India T20 Squad for Asia Cup 2025: दिनांक ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियाचा संघ जाहीर केला. ज्यात सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली असून, शुभमन गिल उपकर्णधार म्हणून भारताच्या टी २० टीमची कमान सांभाळेल. बीसीसीआयने जाहीर केलेल्या आशिया कप २०२५ साठीच्या टीमध्ये कोणकोणत्या खेळाडूंचा स्थान मिळाले आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया आणि निवड समिती यांच्यातील बैठकीनंतर आशिया कप २०२५ साठी निर्णायक संघ जाहीर करण्यात आला. आयपीएलमधील काही सिद्ध कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना यंदा दुर्लक्षित करण्यात आल्याचे दिसते, तर कमी प्रभावी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये शुभमन गिलला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर जसप्रीत बुमराहचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वालला संघात स्थान मिळू शकलेले नाही.
आयपीएल २०२५ मध्ये अय्यरने ६०४ धावा केल्या होत्या तर जयस्वालने ५५९ धावा केल्या होत्या. या दोघांची एकत्रितपणे, एकूण संख्या ११६३ पेक्षा जास्त होती. रिंकू सिंगने आयपीएल हंगामात खराब कामगिरी असूनही संघात स्थान मिळवले आहे. मात्र जयस्वालचा पाच राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे.
आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाचा संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षितराणा, रिंकू सिंग.
आशिया कप २०२५ बद्दल
यावर्षीचा आशिया कप ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान अबू धाबी आणि दुबई येथे खेळला जाणार आहे. तसेच यावेळी ही स्पर्धा टी-२० स्वरूपात असेल. विशेष म्हणजे, यावर्षी पहिल्यांदाच आशिया कपच्या इतिहासात आठ संघांचा समावेश करण्यात आला आहे. या आठ संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. आधी लीग स्टेज सामने खेळवले जातील, ज्यामध्ये प्रत्येक संघ ३ सामने होतील. त्यानंतर अंतिम ४ ची फेरी होईल. यातील अव्वल संघांमध्ये २८ सप्टेंबर रोजी विजेतेपदाचा सामना खेळला जाईल.
आशिया कपमध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक
भारतीय संघाला आशिया कपच्या गट अ मध्ये पाकिस्तान, ओमान आणि युएईसह स्थान देण्यात आले आहे. तर गट ब मध्ये श्रीलंका, बांगलादेश, हाँगकाँग आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. भारतीय संघ आपला पहिला सामना १० सप्टेंबर रोजी दुबईमध्ये युएई विरुद्ध खेळेल. त्यानंतर त्यांचा पुढचा सामना १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये पाकिस्तान विरुद्ध होईल. भारतीय संघ आपला शेवटचा गट सामना १९ सप्टेंबर रोजी अबू धाबीमध्ये ओमान विरुद्ध खेळेल. आशिया कप दोन्ही गटातील टॉप-२ संघ सुपर-४ टप्प्यात पोहोचतील. त्यानंतर सुपर-४ टप्प्यातील टॉप २ संघांमध्ये जेतेपदाचा सामना खेळवला जाईल.