Tuesday, August 19, 2025

पाऊस : मुंबईत मुसळधार, राज्यात संततधार...!

पाऊस : मुंबईत मुसळधार, राज्यात संततधार...!

मुंबई : राज्यभरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते, रेल्वे, शाळा व शेती यावर मोठा परिणाम झाला असून, प्रशासन सतर्क आहे. कोठे पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर काही भागांत दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. हवामान खात्याने अनेक भागांत रेड व ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.


मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले असून, सीएसएमटी–ठाणे आणि सीएसएमटी–मानखुर्द लोकल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. बेस्ट प्रशासनाने अतिरिक्त बसेस सुरू केल्या असल्या तरी, नागरिक संतप्त झाले असून काहीजण रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास करताना दिसत आहेत.


पुण्यात देखील पावसाने स्थानिकांना त्राही भगवान करून सोडले आहे. पुणे शहरात वाहतूक कोंडी आणि ग्रामीण भागात दरड कोसळल्याची घटना घडली. पुण्यात मगरपट्टा, भेकराईनगर आणि हडपसर परिसरात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. आंबाडखिंड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. मात्र, प्रशासनाच्या तत्परतेमुळे ती पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. पुण्यासोबतच सातारा जिल्ह्याला देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून यापार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. पाटण, वाई, महाबळेश्वर आणि इतर 4 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, 20 व 21 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित तालुक्यांबाबत पावसाच्या स्थितीनुसार निर्णय घेतला जाणार आहे.


यासोबतच विदर्भातही पावसाचा चांगलाच मारा सुरू आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अकोल्यात 389 घरे पडली असून 26 जनावरांचा मृत्यू झाला आहे.यवतमाळमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.


लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं राहिलं आहे तर पूर्व विदर्बातील नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला व गडचिरोली येथे जोरदार पाऊस झाला असून, नागपूरमध्ये 108 मिमी आणि चंद्रपूरमध्ये 125 मिमी पावसाची नोंद झाली आहे.


अनेक भागांत रस्ते पाण्याखाली गेले असून, शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.सततच्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर यासारख्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.पाण्याचा निचरा होण्यात अडचणी येत असल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहेत.


कोकणात देखील मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, वाहतूक कोंडी अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोकणात मुसळधार पावसामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अनेक नद्यांना पूर आला असून, काही भागांत दरडी कोसळल्या आहेत. रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यात काही गावांचा संपर्क तुटला आहे. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये पूरपरिस्थिती असून घरांमध्ये पाणी शिरले आहे. महाड (रायगड) येथे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.शाळांना तात्पुरती सुट्टी जाहीर करण्यात आली असून, एस.टी. बस सेवा काही मार्गांवर बंद आहे.प्रशासन, एनडीआरएफ व स्थानिक यंत्रणा सतर्क असून, तात्पुरते निवास व्यवस्थापन सुरू करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा