
पालघर : पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे जलस्रोत असलेल्या तानसा धरणाचे पाणी पातळी पूर्ण क्षमतेला पोहोचल्यामुळे आज पुन्हा एकदा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण प्रशासनाने ३ दरवाजे उघडले असून सुमारे ३३१५.७८ क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे.
तानसा धरण पूर्ण भरले असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्ग करणे आवश्यक झाले आहे. सध्या पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे धरण क्षेत्रात पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.धरणाखालच्या बाजूस असलेल्या तानसा नदीलगतच्या तसेच आसपासच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी अनावश्यकपणे नदीपात्रात किंवा किनारी भागात जाऊ नये. पशुधन व इतर मालमत्ता सुरक्षित स्थळी हलवावीत.कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.स्थानिक महसूल व पोलीस यंत्रणांसह ग्रामपंचायतींना सूचित करण्यात आले असून संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक खबरदारीचे उपाय सुरु करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सतर्क ठेवण्यात आली आहे.प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे, अफवा न पसरवण्याचे व प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.