
ठाणे : भिवंडीत भाजी मार्केटमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे . ज्यात स्पायडरमॅन हातात वायपर घेऊन रस्त्यातील पाण्याचा निचरा करण्यासाठी आहे .
मुंबईत गेल्या तीन दिवसापासून पावसाचा जोर कायम आहे . ज्यामुळे मुंबईकरांची चांगलीच धांदल उडाली आहे . अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे . रेल्वे सेवेवर देखील परिणाम झाला आहे . सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांना कसरत करावी लागत आहे . भिवंडी शहरातील भाजी मार्केट, तीन बत्ती नाका परिसरात पावसामुळे पाणी साचत असते . यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. त्याशिवाय पावसाच्या पाण्यामुळे अनेक दुकानदारांचे नुकसान होते. यामुळे भिवंडी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने यावर ठोस उपाययोजना करून यातून नागरिकांची आणि भिवंडीकरांची या समस्येतून कायमची सुटका करावी यासाठी भिवंडीच्या मुख्य बाजारपेठेत पावसामुळे साचलेल्या पावसाचा पाण्याचा निचरा करण्यासाठी चक्क स्पायडरमॅन उतरून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करताना दिसला.
तसेच , भिवंडी ठाणे या जुन्या रस्त्यावर अंजुर फाटा, राहनाळ,पूर्णा, काल्हेर, कशेळी या मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. राहनाळ गावाच्या हद्दीत होलीमेरी शाळा परिसरातील रस्त्यावर सुमारे अडीच ते तीन फुटापर्यंत पाणी साचले आहे. ज्यामुळे येथे वाहतूक कोंडी झाली असून अनेक वाहने रस्त्यात बंद पडली आहेत . या मार्गावरील पाणी निचरा होणाऱ्या गटारांची स्वच्छता न केल्याने ही समस्या उद्भवली आहे. ज्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे .