
मुंबई: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी धुंवाधार पाऊस कोसळत आहे. शनिवारपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशीही पहाटेपासून पावसाने जोर धरला आहे. मुंबईसोबतच पश्चिम उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
पश्चिम उपनगरांमध्ये अंधेरी, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली तसेच दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदारवर्गाला त्रासाला सामोरे जावे लाग आहेत. आज मुंबईला ऑरेंज अलर्ट आहे. या मुसळधार पावसाचा फटका लोकल वाहतुकीवरही झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पाच ते दहा मिनिटे तसेच हार्बर रेल्वेची वाहतूक पाच मिनिटे उशिराने सुरू आहे.
हवामान विभागाचा इशारा
हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर तसेच यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.
तलाव व धरणे ओसंडली
सांताक्रूझसह मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ९०% वर पोहोचला असून मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन आटोपशीर झाले आहे.
महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा असून प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.