राज्यात पावसाचा हाहाकार, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट; शाळांना सुट्टी

  35

मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे. मुंबईसह कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिकच्या घाट परिसरात 'रेड अलर्ट' जारी केला असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे, नवी मुंबई आणि बुलढाणा जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.



मराठवाड्यात पावसामुळे सहा जणांचा मृत्यू


राज्यातील मराठवाडा विभागात पावसाने सर्वाधिक नुकसान केले असून, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नांदेडमध्ये ३, बीडमध्ये २ आणि हिंगोलीमध्ये १ व्यक्तीचा समावेश आहे. मराठवाड्यातील ५७ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नांदेडमधील मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे.



मुंबईची तुंबई, वाहतूक सेवा विस्कळीत


सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा उशिराने धावत असून, अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेंबूर परिसरातील एका रुग्णालयात पाणी शिरल्याने रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय झाली. तसेच, चुनाभट्टी येथे एमएमआरडीएची संरक्षक भिंत कोसळून सात झोपड्यांचे नुकसान झाले, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सायन, माटुंगा, किंग सर्कल, आणि घाटकोपर यांसारख्या सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली.



मुख्यमंत्र्यांकडून आढावा आणि मदतकार्य


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पावसाच्या स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा असल्याने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, पूरग्रस्त भागातील पंचनामे योग्य पद्धतीने करून नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारची जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले.


दरम्यान, मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या शाळकरी मुलांना आणि रुग्णवाहिकांना मदत करण्यासाठी पोलिसांनी मोलाची कामगिरी बजावली. मुंबईतील शीव आणि विलेपार्ले येथे वाहतूक कोंडीत अडकलेल्या स्कूल बस आणि रुग्णवाहिकेला मदत करून पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवले.

Comments
Add Comment

श्रीगोंद्यात महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न !

श्रीगोंदा : सुरोडी (ता. श्रीगोंदा) येथील मिनाक्षी रामदास सकट (वय ३८ ) यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

तानसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पालघर : पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे जलस्रोत असलेल्या तानसा धरणाचे पाणी पातळी पूर्ण क्षमतेला पोहोचल्यामुळे आज

भाटघर धरणातून ३०५० क्युसेकने विसर्ग , नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भोर : पुण्यातील भोर येथे असलेले ब्रिटिशकालीन भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास १००

दापोलीत मुसळधार पाऊस, मुरुडमध्ये पाणी भरलं, 20 ते 25 घरांचा संपर्क तुटला, खेड दापोली रस्ता बंद

दापोली शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील नाले

नांदेड जिल्ह्यात रावणगावचे ग्रामस्थ गाढ झोपेत असताना आभाळ फाटलं

नांदेड : मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष देणार: मंत्री नितेश राणे

चंदगड: सध्या काजूला असलेला कमी भाव ही चिंतेची बाब असून हा भाव कसा वाढेल आणि शेतकऱ्यांना चांगला दर कसा मिळेल, याकडे