Monday, August 18, 2025

नांदेड जिल्ह्यात रावणगावचे ग्रामस्थ गाढ झोपेत असताना आभाळ फाटलं

नांदेड जिल्ह्यात रावणगावचे ग्रामस्थ गाढ झोपेत असताना आभाळ फाटलं
नांदेड : मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यात रविवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने सहा गावं पाण्याखाली गेली आहेत. यापैकी दोन गावांमध्ये ८० नागरिक अडकून पडले आहेत. पाण्याची पातळी वाढल्याने या नागरिकांना वाचवण्यासाठी राज्य आपत्ती निवारण दलाला बोलावले आहे. लहान होड्या आणि बोटींच्या साहाय्याने नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्गीर येथील धरणक्षेत्राच्या वरच्या भागात पाऊस झाला. त्यामुळे एका रात्रीत 18 फूट पाणी वाढले आहे.

धरणक्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्याने मुखेड तालुक्यातील सहा गावं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. मुखेड तालुक्यात फारसा पाऊस झालेला नाही. मात्र, तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या उद्गीर येथील धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे. रविवारी रात्री गावकरी झोपल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास उद्गीर भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे लेंडी नदीला पूर आला. मुखेड तालुक्यातील भेंडेगाव, बुद्रुक, भिंगोली, हसनाळ, रावणगाव, भासवाडी आणि मारजवाडी ही सहा गावं पाण्याखाली गेली आहेत. यापैकी चार गावांमधील नागरिकांना रात्रीच सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, रावणगाव येथील गावठाणात ८० जण अडकले आहेत. तर हसनाळ येथे नऊ जण अडकले आहेत. या सगळ्यांच्या मदतीसाठी सकाळी सहा वाजल्यापासूनच एसडीआरएफ, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार संपूर्ण यंत्रणेसह बचावकार्यासाठी दाखल झाले आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा