Monday, August 18, 2025

भाटघर धरणातून ३०५० क्युसेकने विसर्ग , नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भाटघर धरणातून ३०५० क्युसेकने विसर्ग , नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भोर : पुण्यातील भोर येथे असलेले ब्रिटिशकालीन भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास १०० टक्के भरले आहे. धरणातून ५ स्वयंचलित दरवाजांमधून १,४०० क्युसेक आणि वीजनिर्मिती केंद्रातून १,६५० क्युसेक, असे एकूण ३,०५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यामुळे नदीकाठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरु आहे . धरणसाखळीतील भुतोंडे, मळे, पांगारी खोर्‍यात होत असलेल्या पावसाने धरणाच्या साठ्यात झपाट्याने वाढ झाली. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस पावसाचा जोर कमी होता . त्या वेळी धरणात 92 टक्के पाणी साठा होता.


भाटघर धरणाची क्षमता २३ टीएमसी आहे. एकूण ८१ दरवाजे असून, ४५ स्वयंचलित, ३६ अस्वयंचलित आहेत. स्वयंचलित दरवाजातून १४०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. पाटबंधारे विभाग, पुणे येथील कार्यकारी अभियंता दिंगबर डुबल यांनी सांगितले की, धरण पूर्णपणे भरल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा