
(जीवनगंध): पूनम राणे
वर्गात इतिहासाचा तास चालू होता. गुरुजी गांधीजींच्या चलेजाव आंदोलनाविषयी बोलत होते. गुरुजींच्या स्फूर्तिदायी आणि प्रेरणादायी बोलण्यातून साऱ्या वर्गातील विद्यार्थी एकाग्र झाले होते.
वर्गातील एक मुलगा मात्र अस्वस्थ झाला होता. त्याच्या धमन्यातील रक्त सळसळत होतं. डोळ्यांतून आग ओकत होती. हाताच्या मुठी आवळल्या जात होत्या. आपणही देशासाठी काहीतरी अग्निदिव्य करावे असा त्याने मनोमन विचार केला होता.
शाळा सुटल्यानंतर एका मंदिरात त्याने मित्रांसोबत एक बैठक आयोजित केली. मीटिंगमध्ये मित्रांसोबत त्यांने एक योजना आखली. आपल्या देशावर राज्य करणाऱ्या इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडावं, त्यांना भारताबाहेर हाकलण. हेच ध्येय आता त्यांच्यासमोर आहे असे तो साथीदारांना सांगू लागला.
त्यांना समजलं होतं की, युद्ध साहित्याने भरलेली आगगाडी रात्रीच्या वेळेस या मार्गाने येणार आहे. ठरलं! बेत पक्का झाला. आगगाडी ज्या रेल्वे रुळावरून जाणार आहे तेच रेल्वेचे रूळ उखडून टाकायचे. चार मित्र आणि हा मुलगा कामाला लागले.
रात्रीची वेळ होती. दाट अंधार पसरला होता. रातकिड्यांचा आवाज येत होता. सगळीकडे भयान शांतता होती. या शांततेत मित्रांसोबत रेल्वे रूळ उकडून काढण्याचा प्रयत्न हा मुलगा साथीदारांसोबत करू लागला. एवढ्यात लांबून कुठून तरी प्रकाशाचा झोत त्या मुलाच्या दिशेने आला. त्या मुलाने ताबडतोब इतर चार साथीदारांना निघून जायला सांगितलं आणि स्वतः मात्र तिथेच रूळ उखडत राहिला.
ब्रिटिश सैनिक इथे येऊन पोहोचले. त्यांनी त्या मुलाला कैद केले. न्यायालयासमोर त्याला उभे करण्यात आले. न्यायाधीश म्हणाले, ‘‘तू हे काम केलेस ते एकट्याने केले नाहीस?” तुझ्यासोबत तुझे साथीदार होते. त्यांची नावं सांग. तुझी शिक्षा कमी केली जाईल. न्यायाधीशांसहित सर्वांचेच लक्ष आता त्या मुलाच्या बोलण्याकडे लागले होते.
मुलगा म्हणाला, ‘‘सांगतो, माझ्या साथीदारांची नाव सांगतो,” माझे चार साथीदार इथेच याच न्यायालयात हजर आहेत. आता मात्र सर्वांच्या नजरा त्या मुलाच्या बोलण्याकडे लागल्या होत्या. या सभागृहात नेमके याचे साथीदार कोण आहेत? आणि हा कोणाची नावं सांगणार!” याची चिंता सर्वांनाच लागली होती.
सारा धीर एकवटून ठणकावून तो मुलगा म्हणाला, ‘‘साहेब, माझे साथीदार याच न्यायालयात आहेत. त्यांची नावे सांगतो. त्यांना इथे हजर करावे. माझ्या पहिल्या साथीदाराचे नाव हातोडा, दुसरा साथीदार पाना, तिसरा साथीदार छिन्नी आणि चौथा साथीदार प्रहार.” मुलाने सांगितलेली साथीदारांची नावे ऐकून न्यायाधीश संतापले. त्यांनी फर्मान ठोकले की या मुलाला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी.
भारत माता की जय, वंदे मातरम, या घोषणा देत हा मुलगा हसत हसत फासावर चढला. या मुलाचे नाव होते हेमू कालानी. सिंध प्रांतात सक्कर या गावात जन्म झालेला आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा भारत मातेच्या चरणी समर्पित झाला.
तात्पर्य - देश स्वतंत्र झाला. मात्र त्यासाठी अनेकांनी हालअपेष्टा सहन केल्या. अनेक जण फासावर गेलेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. राष्ट्र वेड्यांच्या समर्पणातूनच घडले आहे. आज आपण स्वतंत्र भारतात मुक्त श्वास घेत आहोत. याची जाणीव आपण भारतीयांनी नेहमी ठेवायला हवी.