Sunday, October 26, 2025
Happy Diwali

कोकणात विमानाने जाणंही महागलं...

कोकणात विमानाने जाणंही महागलं...

मुंबई-गोवा विमानाचं तिकीट २१ हजारांपर्यंत पोहोचलं!

रायगड : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबई-ठाण्यातून दरवर्षी मोठ्या संख्येने गणेशभक्त कोकणात जात असतात. सण-उत्सवांदरम्यान प्रवास हा मोठा गहन प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो. राखीपौर्णिंमेलाही मुंबई, ठाणे आणि पुण्यात ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. प्रवाशांना दरवर्षी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यंदाही मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांची चाळण आहे. त्यामुळे प्रवासाला अतिरिक्त वेळ लागणार हे निश्चित. अशावेळी कोकणात बाप्पाच्या उत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांचा अधिकांश वेळ हा प्रवासातच फुकट जातो.

कोकणात बाप्पासाठी लवकरच पोहोचता यावं म्हणून अनेकजण विमानाने प्रवास करतात. वाहतूक कोंडीत अडकण्यापेक्षा विमानाने सुसाट पोहोचता येईल अशी आशा असते. मात्र सध्या कोकणात जाणं हे थायलँड, सिंगापूर किंवा दुबईला जाण्यापेक्षाही महाग झालं आहे. दुबईला जाण्यासाठी सर्वात स्वस्त विमानाचे तिकीट १३ हजारांवर आहे. स्पाईस जेट १६ हजार तर एअर इंडियाचं तिकीट १८ हजारांहून अधिक आहे.

२६ ऑगस्ट रोजी, गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी स्पाईस जेटचं मुंबई-गोवा विमानाचं तिकीट २१ हजारांपर्यंत पोहोचलं आहे. ऐरवी ३ हजारांवर असलेलं विमान तिकीट आता थेट सात पटीने वाढून थेट २१ हजारांवर पोहोचलं आहे. त्यामुळे कोकणात जाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी गणेशभक्तांना अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागणार आहे.

२६ आणि २७ ऑगस्ट दरम्यान विमानाचं तिकीट १९ ते २१ हजारांपर्यंत पोहोचलं आहे. यामध्ये काही तिकीटं ही ४ हजार, ७ हजार किंवा १० हजारां दरम्यानही आहेत. सर्वसाधारणपणे मुंबईहून गोव्याला विमानाने जायला १ तास २० मिनिटं इतका वेळ लागतो.

मात्र स्वस्त तिकीटांमध्ये दोन ते चार तासांचा थांबा देण्यात आला आहे. मुंबई ते गोवा प्रवासादरम्यान २४ तासांचा थांबा आहे. त्यामुळे मुंबईहून विमान निघाल्यानंतरही हैद्राबाद किंवा इतर ठिकाणी चार ते पाच तास थांबावं लागणार आहे. एअर इंडियाच्या काही फ्लाइटमध्ये थांब्यासाठीचा वेळ २१ तासांपर्यंत गेल्याचं दिसून येत आहे.

Comments
Add Comment