
मुंबई: मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे आज पहाटे शनिवारी (दि. १६ ऑगस्ट) विक्रोळीतील पार्कसाईट या डोंगराळ परिसरात दरड कोसळली. ज्यामध्ये एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची बातमी आहे.
विक्रोळी पार्कसाईट या परिसरातील डोंगरावर मोठी झोपडपट्टी आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथे दरड कोसळण्याची शक्यता असते, यंदाच्या पावसाळ्यापूर्वीही महानगरपालिकेने हा भाग धोकादायक म्हणून घोषित केला होता, त्यामुळे येथे राहत असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र तरीही इथे अनेक लोकं राहत होती. दरम्यान कालपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे या भागात दरड कोसळण्याची घटना घडली. यात मिश्रा कुटुंबीयांचे घर दरडीखाली गाडले गेले. ज्यामध्ये मिश्रा कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर चौघांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास मिश्रा कुटुंबांच्या घरावर दरड कोसळली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि पालिकेचे अधिकारी याठिकाणी दाखल झाले. बचावकार्यानंतर मिश्रा कुटुंबीयांना दरडीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. मात्र, सुरेश मिश्रा (वय ५०) आणि शालू मिश्रा ( वय १९) या बापलेकीचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर आरती मिश्रा (वय ४५) आणि ऋतुराज मिश्रा (वय २०) या आई आणि मुलावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या दुर्घटनेनंतर आता पालिकेकडून दरड कोसळलेल्या आजुबाजूच्या भागातील घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. डोंगराची माती भुसभुशीत होऊन आणखी एखादी दुर्घटना घडू नये, यादृष्टीने पालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे.
गेल्या महिन्यात, मुंबईतील भांडुपमध्ये काही तासांच्या मुसळधार पावसानंतर एका निवासी भागात दरड कोसळण्याची घटना घडली होती. मात्र त्या भागातील काही घरे आधीच रिकामी करण्यात आली होती, ज्यामुळे कोणतीही दुखापत झाली नव्हती. दरम्यान, शनिवारी मध्य रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे शहरात अनेक भागात पाणी साचू लागले आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीसह अनेक भागात रेड अलर्ट जारी केला आहे. तर नाशिक, पुणे, सातारा आणि जळगाव येथे मुसळधार पाऊस आणि वादळासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.