Saturday, August 16, 2025

राज्यात पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा!

राज्यात पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा!

राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता


मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील काही दिवसांत म्हणजेच १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता असून, यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.


हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टी होऊ शकते. मराठवाड्यातही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस आणि ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात वीज चमकणे आणि गडगडाट होण्याचाही अंदाज आहे.



याव्यतिरिक्त, १६ ते २० ऑगस्ट दरम्यान कोकण किनारपट्टीवर ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, समुद्र खवळलेला राहील. त्यामुळे मच्छीमारांनी या काळात समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, कुंडलिका नदी, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पूरस्थितीपासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.


नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीबद्दल माहिती देण्यासाठी 'सचेत' ॲपद्वारे सतर्कतेचे संदेश पाठवले जात आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांना तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


नागरिकांच्या मदतीसाठी मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्यकेंद्र २४x७ सुरू आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षासाठी फोन नं. ०२२-२२०२७९९० किंवा ०२२-२२७९४२२९ किंवा ०२२-२२०२३०३९ तसेच मोबाईल - ९३२१५८७१४३ उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा