गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमध्ये धुसफूस दिसून येत असून पालघरमधील दुर्वेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनवेळी ते बोलत होते. लॉटरी प्रत्येकाला लागत नाही. पण ज्यांना ती लागलेली आहे, त्यांनी ती योग्यरित्या टिकवली पाहिजे, असा टोलाही नाईकांनी शिंदेंना लगावला. कमावलेलं टिकवता आलं पाहिजे, किती कमवलं आणि कसं कमवलं आणि किती टिकवलं हे महत्त्वाचं आहे, असा चिमटा गणेश नाईक यांनी काढला.
दरम्यान या वादात आता संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. गणेश नाईक सभ्य आणि संस्कारक्षम नेते असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला. पण त्यांच्या डोक्यात मटका असेल”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
गणेश नाईक यांनी नेमकं काय म्हटलं ते आपण पाहुयात
"पालघरसह एकत्रित असलेल्या ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो होतो. त्यावेळी डॉ. हेमंत सावरा यांचे वडील विष्णु सावरा, खासदार चिंतामण वनगा हे देखील जिल्हा नियोजनाच्या बैठकीत असायचे. तेव्हाचे आमदार एकनाथ शिंदे हे सुद्धा त्या जिल्हा नियोजनच्या बैठकीत असायचे. मात्र एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली, प्रत्येकाच्या नशिबाचा खेळ आहे. प्रत्येकालाच लॉटरी लागते असे होत नाही, एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली याचा मला आनंद आहे. पण प्रत्येकाला कमावलेलं टिकवता आलं पाहिजे. किती कमावलं, कसं कमावलं यापेक्षा ते टिकवणे महत्त्वाचे आहे कसे टिकवता यावर जनसामान्यांची नजर असते"
असे सूचक वक्तव्य गणेश नाईक यांनी केलं आहे मात्र या वव्यक्तव्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेनेकडून यावर प्रतिक्रिया आली नाहीय.