गोंदिया: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मागील ११ वर्षांत जलद गतीने प्रगती साधली असून भारत महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने या विकास प्रवासाला साथ द्यावी, असे आवाहन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. गोंदिया जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून विकासकामांचा आढावा घेतला आणि नागरिकांशी संवाद साधला.
स्वातंत्र्यदिनाच्या विविध कार्यक्रमासाठी गोंदिया जिल्ह्यात हजर असलेले मंत्री लोढा यांनी गोंदिया येथील जयस्तंभ चौकातील नवीन प्रशासकीय इमारत येथे आयोजित “विकसित भारताचा अमृत काळ: सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची ११ वर्ष आणि स्वातंत्र्याची अमृत गाथा” या मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली. हा उपक्रम माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि जिल्हा प्रशासन गोंदिया, जिल्हा परिषद गोंदिया, तसेच जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. प्रदर्शन पाहिल्यानंतर ते म्हणाले की, “मोदी सरकारने सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण यांवर लक्ष केंद्रित करून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. विकासात अडथळे आणणाऱ्या शत्रुराष्ट्रांच्या डावांना आपल्या जवानांनी हाणून पाडले आहे.” प्रदर्शनात मागील ११ वर्षांतील महत्त्वपूर्ण प्रकल्प, योजना आणि उपक्रमांची माहिती देण्यात आली असून नागरिकांनी ही माहिती जाणून घेऊन भारताच्या प्रगतीत आपला हातभार लावावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी जिरुटोला या आदिवासी गावाला भेट देऊन स्थानिक युवकांना रोजगार, कौशल्य विकास आणि शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले. महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. यानंतर, माओवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस शिपाई सागर राऊत यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांनी सांत्वनपर विचारपूस केली आणि त्यांच्या शौर्याची आठवण केली. आदिनाथ जैन श्वेतांबर मंदिरात दर्शन घेऊन समाजबांधवांना धार्मिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण करून मंत्री महोदयांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती दिली. धान खरेदी, बोनस वितरण, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, मनरेगा आणि महसूल सप्ताह अशा योजनांची अंमलबजावणी तसेच नक्षलग्रस्त भागातील युवकांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सुरूवातीसंदर्भात त्यांनी विशेष भर दिला.