
नेरळ-माथेरान फेऱ्या वाढवण्याची मागणी
माथेरान : देशविदेशातील पर्यटक नेहमीच माथेरानच्या मिनी ट्रेनची सफर मिळावी यासाठी हमखास इथे पर्यटक हजेरी लावतात. खासकरून नेरळ मार्गे माथेरान हा प्रवास घडावा ही त्यांची अपेक्षा असते. या मार्गावरून येताना निसर्गाचे मनमोहक नजारे आणि विविध पॉईंट्सचे दुरून दर्शन घडते. डोळे दिपवून टाकणाऱ्या उंच उंच खोल दऱ्या आणि वेडीवाकडी वळणे घेत जमिनीपासून जसजसे वर गाडीचा प्रवास सुरू असतो त्यावेळी आपण आकाश भ्रमंती करत असल्याचे भासते. त्यामुळे देशविदेशातील पर्यटक आवर्जून या ठिकाणी भेट देतात.
माथेरानमध्ये दरडी कोसळण्याची दाट शक्यता असल्याने रेल्वे प्रशासन दरवर्षी पावसाळ्यात चार महिने मिनी ट्रेन सेवा बंद करते. १५ ऑक्टोबर ते १५ जून या कालावधीत या ट्रेनची सुविधा उपलब्ध असते. परंतु केवळ दोनच ट्रेन या नेरळ माथेरान मार्गावर धावत असल्याने असंख्य पर्यटकांना मर्यादित तिकिटांमुळे या सेवेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे अनेक पर्यटक निराश होतात. इंजिन उपलब्ध नसल्याची कारणे पुढे करून अथवा स्टाफ नाही, बोग्यांची कमतरता अथवा तांत्रिक दुरुस्ती या प्रकारची कारणे सांगून अधिकारी वर्ग वेळ मारून नेत असल्याचे सांगितले जात आहे.
मुळात या अधिकारी वर्गाची पर्यटकांना उत्तम प्रकारे सेवा उपलब्ध करून द्यावी याबाबत या ट्रेन बाबतीत मानसिकता नाही. यापूर्वीच्या काळात मिनी ट्रेनच्या पाच ते सहा फेऱ्या होत असत. यामध्ये मालवाहू गाडीतून जीवनावश्यक साहित्य असो किंवा बांधकाम साहित्य हे नियमितपणे यायचे. इथल्या शटल सेवेला डबल इंजिन लावून शटलची सुविधा पुरविली जायची. घाटातून केवळ एका इंजिनच्या सहाय्याने पाच ते सहा बोग्या भरून प्रवाशी येतात मग अमन लॉज ते माथेरान दरम्यान घाट सेक्शन नसताना शटलसाठी दोन इंजिनची आवश्यकता नाही. यातील काही इंजिन्स नेरळ माथेरान मार्गावर पर्यटकांच्या वाहतुकीसाठी ठेवल्यास असंख्य पर्यटकांना या सेवेचा लाभ घेता येईल. त्यासाठी अधिकारी वर्गाने पर्यटकांसाठी उन्हाळ्यातील आठ महिने ही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी अनेक वर्षांपासून जोर धरू लागली आहे.
पर्यटकांचे विशेष आकर्षण व जागतिक हेरिटेज दर्जा प्राप्त झालेल्या मिनी ट्रेनच्या नेरळ माथेरानच्या फेऱ्यामध्ये वाढ व्हावी ही काळाची गरज आहे. पूर्वी दिवसभरात पाच येण्यासाठी तर पाच जाण्यासाठी फेऱ्या होत असल्याने येणाऱ्या पर्यटकांना आनंद मिळत होता, तर येथील सर्वसामान्य नागरिकांना महिन्याभराचे जीवनावश्यक साहित्य आणणे व सुरक्षित प्रवास करणे अतिशय सुलभ होत होते. रेल्वे प्रशासनाने याचा पुनःश्चविचार करून या फेऱ्यांमध्ये वाढ करावी आणि पर्यटक व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी केली.