Thursday, August 14, 2025

किश्तवाडमधील ढगफुटीत ४० हून अधिक जणांचा मृत्यू, १५० जण बेपत्ता

किश्तवाडमधील ढगफुटीत ४० हून अधिक जणांचा मृत्यू, १५० जण बेपत्ता

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात गुरुवारी दुपारी १२:३० वाजता ढगफुटी झाली. डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा आणि ढिगाऱ्याचा अनेक लोकांवर परिणाम झाला. या दुर्घटनेतील अधिकृत आकडा समोर आला नसला तरी ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यातील बहुतांश जणांचे मृतदेहही सापडले आहेत. आतापर्यंत ६५ जणांना वाचवण्यात आले आहे. सुमारे दीडशे लोक बेपत्ता आहेत.

मचैल मातेच्या यात्रेसाठी हजारो भाविक चशोटी गावात पोहोचले होते, तेव्हा ही दुर्घटना घडली. यात्रेचा हा पहिला थांबा आहे. यात्रा जिथून सुरू होणार होती तिथेच ढगफुटी झाली. येथे बसेस, तंबू, लंगर आणि भाविकांची अनेक दुकाने होती. सर्व पुराच्या पाण्यात वाहून गेले. मचैल मातेची यात्रा दरवर्षी ऑगस्टमध्ये होते. हजारो भाविक तिथे येतात. हा मार्ग २५ जुलै ते ५ सप्टेंबर या कालावधीत सुरू राहतो. जम्मू ते किश्तवाड असा २१० किमी लांबीचा मार्ग आहे आणि वाहने पद्दार ते चशोटी १९.५ किमी रस्त्यावरून जाऊ शकतात. त्यानंतर मचैलपर्यंत ८.५ किमीचा ट्रेक आहे. या ढगफुटीत आतापर्यंत दोन सीआयएसएफ जवानांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती आहे.


दीडशेहून अधिक लोक बेपत्ता आहेत. शेकडो जण जखमी झाले आहेत. यापैकी साधारण ३० जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना किश्तवाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सुमारे ७० ते ८० इतर जखमींवर पडेरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जम्मू विभागीय आयुक्त रमेश कुमार म्हणाले की, आम्हाला सकाळी ११.३० वाजता चाशोटी परिसरात ढगफुटी झाल्याची माहिती मिळाली. एसआरडीएफ, स्थानिक पोलिस आणि प्रशासनाचे लोक घटनास्थळी पोहोचले आहेत. लष्कर आणि हवाई दलाच्या टीम देखील सक्रिय आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, 'किश्तवाड जिल्ह्यातील ढगफुटीच्या घटनेबाबत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. एनडीआरएफ पथके तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि प्रत्येक परिस्थितीत जम्मू-काश्मीरच्या लोकांसोबत ठामपणे उभे आहोत. गरजूंना सर्वतोपरी मदत केली जाईल.


अपघाताबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त दुःख केले असून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले की, मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी बोललो आहे. जेणेकरून त्यांना जम्मूच्या किश्तवाड भागातील परिस्थितीची माहिती देता येईल. अहवाल गंभीर आणि अचूक आहेत, ढगफुटीमुळे प्रभावित झालेल्या भागातून हळूहळू प्रमाणित माहिती येत आहे. सरकार वेळोवेळी माहिती शेअर करेल. ढगफुटीच्या घटनेनंतर, किश्तवाड, दोडा, भदरवाह या तीन जिल्ह्यांतील सर्व रुग्णवाहिका बचाव कार्यासाठी किश्तवाड जिल्ह्यातील माचैल येथे आहेत. येथे ३० हून अधिक लोक जखमी झाल्याची भीती आहे.

Comments
Add Comment