
मराठा एकीकरण समितीचा सवाल
मुंबई : दादर कबुतरखाना परिसरात घडलेल्या ६ ऑगस्टच्या घटनेचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी यावर पोलिस प्रशासन आणि सरकारला सरळ प्रश्न विचारले आहेत. समितीच्या मते, त्या दिवशी जैन समाजाच्या काही लोकांनी आंदोलन करताना पोलिसांशी वाद घातला, चाकू-सुऱ्यांच्या मदतीने कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडून काढली. इतकंच नव्हे, तर काहींनी उघडपणे शस्त्र उचलण्याची भाषा केली. तरीही पोलिसांनी त्या घटनेत सामील असलेल्या एकाही जैन धर्मीयावर गुन्हा दाखल केला नाही. समितीच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, आज मराठी माणूस शांततेत, कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करत असताना त्याला अटक करण्यात येत आहे. “शस्त्रं काढण्याची धमकी देऊनही जर कोणावर कारवाई होत नसेल, तर ही न्यायव्यवस्थेतील दुटप्पी वागणूक नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याच पार्श्वभूमीवर समितीचे पदाधिकारी गोवर्धन देशमुख यांनी संताप व्यक्त करत म्हटलं, “एरवी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याही विषयावर बोलतात, मग यावर का मौन बाळगतात? ६ ऑगस्टला तुम्ही कुठे होतात? त्या दिवशी पोलिसांनी आम्हाला नाही, तर जैन समाजाच्या आक्रमक आंदोलकांना रोखायला हवं होतं. पण त्याऐवजी आज मराठी माणसालाच पकडलं जातंय. पोलिसांनी मला मारहाण केली, माझं रक्त काढलं म्हणजे मराठी माणसाचंच रक्त सांडलं.”

मुंबई : हायकोर्टाच्या आदेशानुसार दादर येथील कबुतरखाना बंद करण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध म्हणून मागील आठवड्यात येथे आंदोलन झाले होते, ज्यामध्ये ...
आणीबाणीचा काळ आणू नका
मराठी एकीकरण समितीने पूर्वनियोजितप्रमाणे आज आंदोलन करण्याची घोषणा केली होती, मात्र पोलिसांनी यासाठी परवानगी नाकारली होती. त्याचबरोबर काल रात्रीच समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवून कारवाईचा इशाराही दिला होता. तरीदेखील, आज सकाळी सुमारे ११ वाजता समितीचे अनेक कार्यकर्ते दादर कबुतरखान्याजवळ दाखल झाले. यामध्ये समितीचे पदाधिकारी गोवर्धन देशमुख स्वतः उपस्थित होते. देशमुख यांनी पोलिसांना भेटून निवेदन देण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी परिसरात पाऊल टाकताच पोलिसांची एक तुकडी त्यांच्या भोवती गोळा झाली. काही मिनिटांतच त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या वेळी देशमुख यांनी, “आम्ही फक्त पोलिसांना सहकार्याची अपेक्षा करतो. आंदोलनावर बंदी घालून आणीबाणीचा काळ आणू नका,” असे वक्तव्य केले. मात्र, त्यांच्या अटकेच्या हालचालींमुळे मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. परिस्थिती तणावपूर्ण होत असतानाच अखेर पोलिसांनी गोवर्धन देशमुख यांना पकडून थेट गाडीत बसवले. या कारवाईनंतर समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
तर मग मराठी माणसांना तोच न्याय का मिळत नाही?
आज सकाळपासूनच दादर कबुतरखान्याच्या परिसरात पोलीस सतर्क मोडमध्ये होते. अतिरिक्त कुमक मागवून कडेकोट बंदोबस्त उभारण्यात आला होता, तर परिसरातील अनेक दुकानं बंद ठेवण्यात आली. यावेळी मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते ठिकाणी पोहोचताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांना गाड्यांमध्ये कोंबण्यास सुरुवात केली. पदाधिकारी गोवर्धन देशमुख यांना तर अवघ्या काही मिनिटांतच पोलिसांनी पकडून थेट गाडीत बसवले आणि पोलीस ठाण्यात रवाना केले. या जलद कारवाईमुळे कार्यकर्त्यांचा रोष अधिक वाढला. विशेष म्हणजे, कार्यकर्त्यांकडून असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे की, ६ ऑगस्टला जैनधर्मीयांना कोणत्याही अडथळ्याविना आंदोलन करण्याची मुभा देण्यात आली, तर मग मराठी माणसांना तोच न्याय का मिळत नाही?