Monday, August 11, 2025

नगरपालिकेत समाविष्ट होण्यास वरसोली ग्रामपंचायत उत्सुक

नगरपालिकेत समाविष्ट होण्यास वरसोली ग्रामपंचायत उत्सुक

कुरूळ ग्रामपंचायत अनुत्सुक; हद्दवाढीबाबत मागविल्या हरकती


अलिबाग : नगरपालिकेच्या हद्दीलगतच्या ग्रामपंचायतींचा समावेश नगरपालिकेत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्या तोंडी आदेशानुसार, अलिबाग नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी सचिन बच्छाव यांनी हद्दवाढीबाबत ग्रामपंचायतींकडून हरकती मागविल्या आहेत. या ग्रामपंचायतींपैकी वरसोली, वेश्वी आणि चेंढरे या तीन ग्रामपंचायती उत्सुक असून, कुरूळ ग्रामपंचायत अजूनही अनुत्सुक आहे.


अलिबाग नगर परिषदेचा सध्याचा कारभार मुख्याधिकारी तथा प्रशासक म्हणून सचिन बच्छाव यांच्या देखरेखेखाली सुरू आहे. अलिबाग नगरपरिषद हद्दीतील लोकसंख्या पाहता, ती दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, नगरपालिकेच्या हद्दीलगतच्या चेंढरे, वरसोली, वेश्वी आणि कुरूळ, आक्षी या ग्रामपंचायतींचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या निर्णयाला चारपैकी एका म्हणजे कुरूळ ग्रामपंचायतीने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आगामी काळात या ग्रामपंचायतीबाबत काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अलिबाग नगरपालिकेची सध्याची हद्द जेमतेम ६ किमी. इतकीच आहे. लगतच्या ग्रामपंचायतींना सहभागी करून घेतल्यानंतर ही हद्द २५ किमीपर्यंत वाढणार आहे. सध्या शहरातील पाणीप्रश्नासह अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत.


अलिबाग नगर परिषदेसाठी नगरोत्थान योजनेंतर्गत ६० कोटींची पाणीयोजना मंजूर झाली असून, त्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत शहराची पाणी समस्या सुटणार असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली आहे. त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतींचा नगर परिषदेमध्ये समावेश झाल्यानंतर विविध सुविधा नागरिकांना पुरविणे शक्य होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.


अलिबाग शहराची सध्याची लोकसंख्या २२ हजार इतकी आहे. आकाराने शहर छोटे असले, तरी आजही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत असल्याचे दिसून येते. कचऱ्याचा प्रश्न खूपच गंभीर बनला आहे. कचरा वेळेत उचलला जात असला, तरी तो टाकायचा कुठे हा प्रश्न आहे. अनेक इमारती, घरांमध्ये पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. शहराच्या काही भागात अरुंद रस्ते असल्यामुळे रहद्दारीची आणि वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते आहे. पर्यटनस्थळ असलेल्या अलिबागमध्ये वाहनांच्या पार्किंगची समस्या कायम आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे पूर्णपणे हटविण्यात नगरपालिकेला अपयश आले आहे, तसेच पावसाळ्य़ात काही रस्ते पाण्याखाली असतात. त्याचा त्रास सर्वानाच होत असतो.


आमदार महेंद्र दळवी यांनी दिलेल्या तोंडी आदेशानंतर हद्दवाढीची ही प्रक्रिया सुरू झाली आहे. हद्दवाढीने अलिबाग शहराचा सुनियोजित विकास करता येणार आहे. त्याचबरोबर वरसोली, चेंढरे, वेश्वी, कुरूळ या ग्रामपंचायतींची योग्य विकास होणार आहे. विविध कार्यालये सुरू करता येणार असून, अलिबाग शहरातील पाणी योजनेचे काम सुरू झाल्याने येत्या दोन वर्षांत पाणी समस्याही दूर होणार आहे. त्यामुळे अलिबाग नगर परिषदेकडून हद्दवाढीचे प्रयत्न सुरू आहेत.
- सचिन बच्छाव, मुख्याधिकारी, नगर परिषद, अलिबाग
Comments
Add Comment