
मुंबई: वरळीतील शिवसेना शाखा क्र. १९८ च्या महिला शाखाप्रमुख पूजा बरिया यांना काल उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या धक्काबुक्की आणि मारहाणीची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पूजा बरिया यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांची विचारपूस केली.
वरळी येथे नारळी पौर्णिमेच्या दिवशी उबाठाचे आदित्य ठाकरे आणि त्यांचे काही कार्यकर्ते तसेच दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आणि काही शिवसैनिक आमनेसामने आले. त्यादरम्यान झालेल्या गोंधळात गोंधळात उबाठाकडून शिवसेना महिला शाखाप्रमुखा पूजा बरिया यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे सदस्य असलेल्या सिद्धेश शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण?
सिद्धेश शिंदे यांनी नारळी पौर्णिमेवेळी झालेल्या गर्दीत पूजा बारिया यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे, ज्यात त्यांना दुखापत देखील झाली. ज्यामुळे सिद्धेश शिंदे यांच्यावर दादर पोलीस ठाण्यात बीएनएसच्या कलम ११५(२) अंतर्गत अदलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या महिला शाखाप्रमुख पूजा बरिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेची दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पूजा बरिया यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांची विचारपूस केली.
यादरम्यान, पूजा बरिया यांनी डॉ. गोऱ्हे यांना सांगितले की, 'आम्हाला चिथावणी देऊन आमच्याकडून हात उचलावा, असा त्यांचा प्रयत्न होता.' त्यावर गोऱ्हे यांनी पूजाला धीर देत 'आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत,' असे सांगितले. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि आगामी मुंबई महानगरपालिकेतील पराभवाच्या भीतीने उबाठा गटात नैराश्य पसरले आहे, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. यासोबतच, त्यांनी पूजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले. तसेच, उबाठा गटाने केलेल्या या गैर कृत्याद्वारे महिलांचा अपमान केला आहे, असेही गोऱ्हे यांनी नमूद केले.