
नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या भारताच्या कसोटी मालिकेत धीराने नेतृत्व केल्याबद्दल भारतीय फलंदाज करुण नायरने नवा कसोटी कर्णधार शुभमन गिलचे कौतुक केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत करुण आठ वर्षांनी भारतीय संघात परतला. रोहित शर्मा आणि विराट कोहली कसोटी स्वरूपातून निवृत्त झाल्यामुळे आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या संघ-प्रथम धोरणामुळे भारत या मालिकेत बदलाच्या टप्प्यातून गेला होता.
करुणने इंग्लंड दौऱ्यापूर्वी २०१७ मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. पण देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीमुळे त्याला पुन्हा भारतीय संघात सामील होण्याची संधी मिळाली होती. भारत आणि इंग्लंडमधील ही मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. करुणने गिलच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आणि मालिकेदरम्यान भारतीय संघाच्या सातत्याचे श्रेय नव्या कर्णधाराला दिले आहे.
करुण म्हणाला, 'शुभमनने सर्वांना एकत्र ठेवण्याची पद्धत आणि त्याने दिलेले प्रोत्साहन कौतुकास्पद होते. सुरुवातीपासूनच त्याचा संवाद अगदी स्पष्ट होता. फलंदाज म्हणून त्याने जे काही साध्य केले आणि एक नेता म्हणून संघाचे नेतृत्व केले.' पदार्पणाच्या कसोटी कर्णधार म्हणून गिलसाठी ही मालिका चांगली होती. भारताने पाचवा कसोटी सामना रोमांचक पद्धतीने जिंकला.ज्यामुळे मालिका बरोबरीत राखता आली.
इतकेच नाही तर गिलने फलंदाजीनेही शानदार कामगिरी केली आणि ७५४ धावा करून मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने एजबॅस्टन येथे द्विशतक आणि शतकही झळकावले.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत करुण नायर पहिल्या चार सामन्यांमध्ये आपल्या शानदार सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करू शकला नाही. पण ओव्हल कसोटीत त्याने पहिल्या डावात ५७ धावांची महत्त्वाची खेळी खेळून प्रभाव पाडला. भारताच्या मालिका बरोबरीत आणणाऱ्या विजयात ही खेळी महत्त्वाची ठरली होती.