
गोरखपूर: श्रावण महिना संपताच मासे खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या खवय्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे. माशांच्या दुकानावर खरेदी करण्याच्या वादातून दोन गट थेट राष्ट्रीय महामार्गावर भिडले. या भांडणाने विकोपाचे रूप धारण केले आणि दोन्ही गटांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
नेमके काय घडले?
ही घटना शनिवारी संध्याकाळी गोरखपूर जिल्ह्यातील पिपराईच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीपीगंज बाजारामध्ये घडली. नेपाळकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका माशांच्या दुकानावर ही घटना घडली. कोलहुवा गावातील मुकेश कुमार चौहान आणि भगवानपूर गावातील रितिक चौहान हे दोघेही प्रत्येकी पाच किलो रोहू माशांची ऑर्डर देण्यासाठी दुकानात आले होते. मात्र, त्या वेळी दुकानात फक्त चार किलो मासे शिल्लक होते. याच चार किलो माशांवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
दुकानदाराने दोघांनाही मासे अर्धे-अर्धे वाटून घेण्याचा किंवा दुसऱ्या दुकानातून खरेदी करण्याचा सल्ला दिला, पण दोन्ही बाजूंनी ते ऐकले नाही. बघता-बघता त्यांच्यातील शाब्दिक बाचाबाचीने धक्काबुक्कीचे आणि नंतर हाणामारीचे स्वरूप घेतले.
हायवेवर वाहतूक कोंडी
हे दोन गट एकमेकांना मारहाण करत असताना, ते रस्त्याच्या मधोमध आले. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक थांबली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच पिपराईच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने दोन्ही गटांना शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे हायवेवर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.