
मानसिक छळ, मारहाण, लैंगिक अत्याचार, आत्महत्येसारखे गंभीर प्रकार
पुणे: महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तत्काळ लागू करावा, अशी मागणी करत सकल हिंदू समाजाच्या महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून ही ओवाळणी देण्याची मागणी शुक्रवारी केली.
नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून सकल हिंदू समाजाच्या वतीने राज्यभर जनजागृती मोहिमेची सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत हिंदू महिलांनी आपल्या भागातील आमदार, खासदार, नगरसेवक व स्थानिक लोकप्रतिनिधींना राखी बांधून महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तत्काळ लागू करण्याची मागणी केली. पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस कवायत मैदान येथे सकाळी या उपक्रमाचा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस यांना अनेक हिंदू महिलांनी राखी बांधली व लव्ह जिहादविरोधी कायद्याची जलद अंमलबजावणी करण्याची गरज पटवून दिली.
कायदा संमत करून अमलात आणावा
‘महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रेमाच्या नावाखाली अनेक हिंदू युवतींना फसवून नंतर जबरदस्तीने धर्मांतरास भाग पाडले जाते. या घटनांमध्ये मानसिक छळ, मारहाण, लैंगिक अत्याचार, आत्महत्येसारखे गंभीर प्रकार घडत असून त्याला आळा घालण्यासाठी स्वतंत्र व कठोर कायदा आवश्यक आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात या राज्यांमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदे अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रात असा कायदा नाही. परिणामी पोलिसांनाही कारवाई करताना कायदेशीर मर्यादा भेडसावत आहेत. म्हणून राज्य सरकारने कठोर कायदा संमत करून अमलात आणावा,’ अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केली आहे.