Saturday, August 9, 2025

पुणे जिल्ह्याचा कायापालट होणार , ३ नव्या महापालिका तयार होणार

पुणे जिल्ह्याचा कायापालट होणार , ३ नव्या महापालिका तयार होणार

पुणे : पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केलीय. चाकण, हिंजवडी आणि उरळी देवाची-मांजरी-फुरसुंगी या तीन भागांसाठी नव्या महानगरपालिका स्थापन होणार आहेत. या निर्णयामुळे पुण्याचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय चेहरा बदलेल


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 8 ऑगस्ट 2025 रोजी चाकण चौक परिसराची पाहणी केलीय आणि पुणे जिल्ह्यात तीन नव्या महानगरपालिका स्थापन करण्याची घोषणा केली. पावसात पुण्याचा आयटी हब असलेला हिंजवडी परिसर पाण्यात गेला होता. त्याचीही पार्श्वभूमी यामागे आहे. चाकण महानगरपालिकेचा विचार करता त्या चाकण, आळंदी आणि खेड-राजगुरुनगर नगरपरिषदांसह सुमारे 50 गावांचा समावेश असेल. सध्या त्याची लोकसंख्या सुमारे साडेचार लाख आणि क्षेत्रफळ 300-350 चौरस किलोमीटर असणार आहे. तर हिंजवडी महानगरपालिकेत पुण्याच्या आयटी हबला पायाभूत सुविधा आणि निधी मिळवण्यासाठी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्यात येणार आहे.



उरळी देवाची-मांजरी-फुरसुंगी महानगरपालिका ही पुण्याच्या या विस्तारित भागातही स्वतंत्र प्रशासनाची गरज आहे. या तिन्ही महानगरपालिकांमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांवरील ताण कमी होईल आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल.


या नव्या महानगरपालिकांचा सामाजिक आणि आर्थिक फायदाही होणार आहे. महानगरपालिका केल्याशिवाय वर्ल्ड बँक आणि केंद्र सरकारचा निधी मिळत नाही. या निधीमुळे चाकणसारख्या औद्योगिक क्षेत्रात रस्ते, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थांसारख्या पायाभूत सुविधा सुधारतील. हिंजवडीत आयटी कंपन्यांना अधिक चांगलं प्रशासन आणि सुविधा मिळतील. त्याचबरोबर रोजगारही वाढेल. उरळी देवाची-मांजरी-फुरसुंगीतही शहरीकरणाला गती मिळेल. सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रहिवाशांना चांगलं जीवनमान मिळेल.


या महानगरपालिकांमुळे स्थानिक पातळीवर सामाजिकदृष्ट्या निर्णय वेगाने घेता येतील. गावांमधील अतिक्रमणं, वाहतूक कोंडी आणि पाणी साचण्याच्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करता येतील. यासाठी अजित पवार यांनी ठाणे, मुंबई आणि मिरा-भाईंदर महानगरपालिकांची उदाहरणं दिली आहेत. स्वतंत्र प्रशासनामुळे विकासाला गती मिळते. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाला स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळेल. पायाभूत सुविधा आणि स्थानिक प्रशासनाच्या समस्यांवर मात करत या महानगरपालिका पुण्याला अधिक समृद्ध आणि सुसज्ज बनवतील. अजितदादांच्या या घोषणेचं स्वागत करत पुणेकर आता या बदलाची वाट पाहत आहेत, मात्र प्रत्यक्षात या बदलांना किती वर्ष लागणार हे, येत्या काळात स्पष्ट होईल.

Comments
Add Comment