काँग्रेसचे माजी आमदार मधु चव्हाण यांचा आरोप
भाडेतत्वावरील खासगी बसेस बंद करा
मुंबई : बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असून बेस्ट तोट्यात जाण्यास मागील २५ वर्षांपासून सत्तेवर असणारे सत्ताधारीच जबाबदार असल्याचा अप्रत्यक्ष आरोप काँग्रेसचे माजी आमदार मधु चव्हाण यांनी केला. उबाठा शिवसेनाच बेस्टच्या ऱ्हासाला कारणीभूत असल्याची जोरदार टीका करत ठाकरेंना काँग्रेसनेच घरचा आहेर दिला. बेस्ट दिनाच्या पूर्वसंध्येला देत बेस्टच्या आजच्या वाताहातीला कोण जबाबदार यावर अधोरेखित करत आपली बेस्टच्या माध्यमातून मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला काँग्रेसच्यावतीने जाहिर पाठिंबा असेल असे स्पष्ट केले.
गुरुवारी ७ ऑगस्ट हा बेस्ट दिन असून ९९ वर्षे पूर्ण होवून शतकोत्सव वर्षांत पदार्पण करत आहे. बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी असून आता ती बेस्ट राहिलेली नाही. त्यामुळे बेस्ट उपक्रम तोट्यात जाण्यास आणि अशाप्रकारच्या आर्थिक संकटात जाण्यास गेली २५ वर्षे सत्तेवर असलेला सत्ताधारी पक्ष आणि ज्यांनी महापालिकेत प्रशासक बसवले ते जबाबदार असल्याचे म्हटले आहे. मुंबई महापालिकेत आणि पर्यायाने बेस्ट समितीवर २५ वर्षे उबाठा शिवसेनेची सत्ता होती आणि महापालिकेत प्रशासकही उबाठा शिवसेनेचे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच बसवले गेले आहे. त्यामुळे याला ठाकरे आणि त्यांची शिवसेनाच जबाबदार असल्याचा अप्रत्यक्ष आरोप चव्हाण यांनी आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत बोलताना केला. बेस्ट ही पूर्वी सोयीची पण आता ती गैरसोयीची झाल्याचा आरोपही त्यांनी केली.
तसेच याप्रसंगी काँग्रेसच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी मुंबईतील लाल डब्ब्याचे नुकसान आणि रस्त्यावरील खड्डे करणारे एकच असल्याचे सांगत रस्ते कामांसाठी नियुक्त केलेल्या मेगा इंजिनिअरींग कंपनीशी संलग्न तथा भगिनी संस्था असलेल्या कंपनीलाच बेस्ट बसेस भाड्याने घेण्याचे कंत्राट दिल्याचा आरोप केला. बेस्टने प्रथम २१०० बसेस भाडेतत्वावर घेण्यासाठी निविदा काढली आणि त्यासाठीचे कंत्राट दिले. परंतु या २१०० पैकी केवळ ६५० बसेसचा पुरवठा केल्यानंतर पुढील बसेसचा पुरवठा होवू शकला नाही. याप्रकरणी संबंधित कंपनीवर कोणतीही कारवाई नसून त्याच कंपनीला आता अधिक दराने २४०० बसेस भाडेतत्वावर पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे चायनाच्या नावाखाली २१०० बसेसची पूर्तता न करणारी कंपनी आता या बसेसचा पुरवठा करणार नसून अधिक पैसे मिळणार नसल्याने २४०० बसेस पुरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही म्हात्रे यांनी सांगितले.