Tuesday, August 5, 2025

Kabutar Khana : "१००% टॅक्स लावा, आम्ही तयार!", कबुतरखान्यासाठी गुजराती-जैन समाज आक्रमक!

Kabutar Khana :

मुंबई : मुंबईत विविध ठिकाणी असलेले कबूतरखाने बंद करण्याच्या मुद्यावरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करत कबूतरखाने बंद करण्यात येत आहेत. मात्र यामुळे प्राणीप्रेमी आणि जैन समाजाचे नागरिक चांगलेच संतापले असून ही कारवाई बंद करण्याची मागणी केली जात आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर मुंबई महापालिकेने कबुतरखाने (Kabutar Khana) बंद केले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याचदरम्यान एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.




कबुतरांना खायला घालणं, हे आमचे संस्कार


दादरमधील कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाज आणि काही गुजराती तेथे एकत्र आले होते. यावेळी कबुतरांना खाऊ घातल्यास तुम्हाला त्यावर जेवढा टॅक्स लावायचा असेल तर लावा, तो आम्ही भरण्यास तयार आहोत. कबुतरांना खाऊ घातल्यावर टॅक्स लावा आम्ही गुजराती जैन टॅक्स भरू, असं सदर लोक बोलताना दिसले. कुत्र्याला, कबुतरांना खायला घालणं, हे आमचे संस्कार आहेत, असंही सदर जमावाकडून सांगण्यात आले. डोनाल्ड ट्रम्पने जसा २५ टक्के टॅक्स आकारला, तसा आमच्यावर १०० टक्के टॅक्स लावा, आम्ही तो भरण्यास तयार आहे, असंही जैन समाज आणि गुजराती म्हणाले.




आज मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक


कबुतरखाने बंद करण्यावरुनच भाजपमध्येच मतभेद असल्याचं समोर आलंय. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कबुतरखान्यांसंदर्भात महत्त्वाची बैठक घेणार आहेत. एकीकडे कबुतरखाने बंद करण्याला धार्मिक संघटनांनी विरोध केला आहे. तर मंत्री मंगलप्रभात लोढांनीही याच संघटनांशी मिळती जुळती भुमिका घेतल्याने मनसेने तिखट प्रतिक्रीया व्यक्त केलीय. मात्र याप्रश्नी बैठक घेऊन मध्यम मार्ग काढण्याचे सुतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या या बैठकीत उच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात राज्य सरकार काय भूमिका घेतंय?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



आहाराअभावी कबूतरांचा रस्त्यांवर मृत्यू : मंत्री मंगल प्रभात लोढा


मुंबईत कबूतरांना आहार देण्यावर निर्बंध लावण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून पक्षीप्रेमी, साधू-संत व नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेण्याची विनंती केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सुवर्ण मध्य काढण्याचे आवाहन त्यांनी पत्राद्वारे केले. लोढा यांनी पत्रात नमूद केले आहे की, आहाराअभावी कबूतरांचा रस्त्यांवर मृत्यू होत असून त्यामुळे नवीन सार्वजनिक आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत. याबाबत महापालिकेने व्यापक आणि संतुलित दृष्टिकोन ठेवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment